युवकाचे अपहरण; तिघे जाळ्यात
By Admin | Updated: May 27, 2015 00:57 IST2015-05-26T23:20:31+5:302015-05-27T00:57:18+5:30
पोलीस कोठडीत रवानगी : सूत्रधारासह दोघे फरारी; नगर जिल्ह्यातील टोळी इस्लामपुरात सक्रिय

युवकाचे अपहरण; तिघे जाळ्यात
इस्लामपूर : सोने देण्याचे आमिष दाखवून इस्लामपुरातून अपहरण केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची सुटका करण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या नगर जिल्ह्यातील तिघांची पोलीस कोठडीत रवानगी झाली. यातील अन्य दोघे अद्याप फरारी आहेत. उध्दव अंजाबा गीते (वय २६, रा. डोंगरवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), तौफिक जमील देशमुख (२१, नांदगाव, जि. अहमदनगर) व किशोर ज्ञानदेव सरोदे (२७, रा. वाघोली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार विजय कोळी (रा. रेठरेधरण) व अनिल गवते (अहमदनगर) हे फरारी आहेत. या सर्वांविरुध्द पोलिसात अपहरण, खंडणी व बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.
या सर्वांनी दिग्विजय संजय खांबे (२०, रा. यल्लम्मा चौक, इस्लामपूर) याचे १९ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात रिव्हॉल्व्हर, मोटारीसह (क्र. एमएच १६-ए टी— ८३३) दुसऱ्या एका मोटारीचा वापर केला होता. याप्रकरणी अपहरण झालेल्या दिग्विजय खांबे याची बहीण शीतल बाळकृष्ण पवार (२२, रा. इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अपहरण झालेला दिग्विजय हा पेठ येथील पॉलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. रेठरेधरण येथील विजय कोळी याच्याशी त्याची ओळख झाली होती. त्यातून कोळी हा अवैध धंदे करीत असल्याची माहिती दिग्विजयला मिळाल्यावर त्याने त्याच्याकडे कामाची मागणी केली. कोळी याने त्याला सोने देण्याचा बहाणा करून सोबत घेतले. पुण्यात गेल्यावर नगर जिल्ह्यातील चौघांनी त्याला ताब्यात घेतले. पुण्यातून कोळी हा निघून आला. नगरमध्ये गेल्यावर दिग्विजयला आपले अपहरण करण्यात आल्याची जाणीव झाली. यादरम्यान दिग्विजयच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता.
पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सौ. पवार यांच्या मोबाईलवरच अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून बोलणी सुरू ठेवली. ‘५ लाख द्या, नाही तर मुलास ठार मारेन’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यावर तातडीने पोलिसांचे पथक पाठवून वाघोली येथून दिग्विजय खांबे याची सुटका करून तिघांना ताब्यात घेतले.
यातील उध्दव गीते व तौफिक देशमुख या दोघांना २७ मेपर्यंत, तर किशोर सरोदे याला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारी व रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. (वार्ताहर)
बहिणीशी संपर्क
२१ मे रोजी सकाळी बहिणीच्या मोबाईलवर दिग्विजयने संपर्क साधून, ‘मला कुणीतरी पळवून आणल्या’चे सांगितले. दुपारी पुन्हा त्याचा फोन आल्यावर शीतल पवार यांनी त्याच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली.