केंपवाड कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST2021-03-10T04:27:40+5:302021-03-10T04:27:40+5:30
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार ...

केंपवाड कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा काढणार
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, संतोषवाडी, जानराववाडी या परिसरात केंपवाड येथील साखर कारखान्याच्या राखेमुळे दोन हजार एकरवरील शेतीला फटका बसत आहे. कारखान्याने प्रदूषण नियंत्रण व्यवस्था बसवावी यासाठी अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा लिंगनूर येथील बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
परिसरात केंपवाड कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या राख व धुळीच्या कणांमुळे होणाऱ्या नुकसानप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खराडे म्हणाले की, केंपवाड कारखान्याची निर्मिती होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली असून, कारखान्याच्या चिमणीतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडते. द्राक्ष घडावर ही राख पडते. त्यामुळे द्राक्षघड काळे पडतात व काळी पडलेली द्राक्षे कमी दराने विकावी लागतात. राख, भुसा, आणि दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतातील ऊस, कापूस, गहू, हरभरा, मका या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. कारखान्यामुळे होणारे प्रदूषण पुढील हंगामापूर्वी नियोजन करून थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष भरत चौगुले, शाखाध्यक्ष नंदू नलवडे, सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, राजाराम नाईक, दीपक मगदूम, अशोक मगदूम, शिवदास शिंदे ,राजू मगदूम, किरण नागणे उपस्थित होते.
कोट
केंपवाड कारखान्याच्या राखेमुळे द्राक्षबागेवर व घडावर राखेचा काळा थर साचल्यामुळे चांगला माल तयार होऊनही व्यापारी द्राक्षे घेत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
- संजय यादवाडे, द्राक्ष बागायतदार, लिंगनूर