सांगली : पश्चिम महाराष्ट्रातून मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. सांगली जिल्ह्यातील जे मोठे घराणे यायचे होते, ते आलेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्रीताई पाटील यांना योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते.
माजी महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचा प्रवेशमाजी महापौर किशोर शहा, किशोर जामदार, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, अजित सूर्यवंशी, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, सुभाष यादव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव, माजी सरपंच निवास पाटील, तानाजी पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाटील, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, शीतल लोंढे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षप्रवेशाचा हा चमत्कार भाजपचे नेते शेखर इनामदार व जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्यामुळे झाला.
दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून काँग्रेस नेते पक्ष सोडतातभाजपने विरोधी पक्षात असतानाही कधीही देशहित आणि समाजहिताचा विचार सोडला नाही, मात्र विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व हे दिशाहीन आहे. नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याने आज अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरणफडणवीस यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्रीताई पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. मात्र, भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
भाजपमध्ये सन्मानजनक वागणूक मिळेल : जयश्रीताई पाटीलमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याच्या, सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. भाजपमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल, याची खात्री आहे, असेही जयश्रीताई पाटील यावेळी म्हणाल्या.