जयंतराव-मदनभाऊ-भाजप एकत्र
By Admin | Updated: April 25, 2015 00:07 IST2015-04-25T00:03:07+5:302015-04-25T00:07:26+5:30
कदम गट आऊट : सर्वपक्षीय आघाडीत अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक यांची निराशा

जयंतराव-मदनभाऊ-भाजप एकत्र
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस नाट्यमय राजकीय घडामोडींनी गाजला. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी एकत्र येत माजी मंत्री पतंगराव कदम गटाला वगळून सर्वपक्षीय आघाडी केली.
या आघाडीत भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला स्थान देण्यात आले. दिवसभर चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या कदम गटाला या धक्क्यातून सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे कदम गटाचे केवळ चारच उमेदवार रिंगणात उरले आहेत. या आघाडीत माजी मंत्री अजितराव घोरपडे व आमदार शिवाजीराव नाईक गटाची मात्र निराशा झाली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय आघाडीची चर्चा आठवडाभर सुरू होती. राष्ट्रवादीने काँग्रेस, भाजप, शिवसेना यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते. काँग्रेसने भाजपला वगळून राष्ट्रवादीशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती, तर भाजपमधील आ. विलासराव जगताप यांनी कदम गटाला विरोध केला होता. गेल्या तीन दिवसांपासून सर्वपक्षीय आघाडीच्या चर्चेला वेग आला होता. माजी मंत्री जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळपर्यंत सारे काही सुरळीत आहे, असेच वातावरण होते.
सरस्वतीनगर येथील बंगल्यातून जयंत पाटील रात्रभर सूत्रे हलवत होते. पहिल्या टप्प्यात भाजपशी चर्चा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीने थेट मदन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी जयंतरावांचा निरोप मदनभाऊंच्या बंगल्यावर पोहोचवला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या. रात्रभर आ. जगताप यांनी जयंतराव व मदनभाऊ यांच्यातील मध्यस्थाची भूमिका बजावली.
शुक्रवारी सकाळी पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. मदन पाटील ‘विजय’ बंगल्यातून इच्छुकांची समजूत काढून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करीत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेही तेथे थांबून होते, तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या निवासस्थानी जयंत पाटील बैठका घेत होते. सकाळी अकरा वाजता भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्रअण्णा देशमुख, दिलीपतात्या पाटील यांची बैठक झाली. बैठकीत प्रत्येक तालुक्यातील इच्छुकांना बोलावून त्यांना अर्ज माघारीचे आदेश देण्यात येत होते. नेत्यांचा आदेश मानून आम्ही अर्ज मागे घेत आहोत, असे सांगताना अनेक इच्छुकांना निराशा लपविता येत नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास मदन पाटीलही बैठकीत सामील झाले. त्यानंतर उमेदवारी यादी निश्चितीची खलबते सुरू झाली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेस भवनात थांबून होते. ते चर्चेला गेलेच नाहीत. यावेळी काँग्रेसचे इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या इच्छुकांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे इच्छुकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीला सोबत न घेता स्वतंत्र पॅनेल करण्याची मागणीही काही कार्यकर्त्यांनी केली, पण राष्ट्रवादीकडून चर्चेचे निमंत्रण येईल, या आशेवर काँग्रेसचे नेते बसले होते. शेवटपर्यंत सर्वपक्षीय आघाडीकडून कदम गटाला निरोप देण्यात आला नाही.
दुपारी तीन वाजता जयंत पाटील यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. सर्वपक्षीय आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला १४, भाजपला चार, काँग्रेसच्या मदन पाटील गटाला दोन जागा, तर शिवसेनेला एक जागा देण्यात आली. या आघाडीत अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, दिनकर पाटील या भाजपच्या नेत्यांची मात्र निराशा झाली. त्यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही.
एक खासदार, एक आमदार, तीन माजी आमदार
- सर्वपक्षीय आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनेलच्या उमेदवार यादीत खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर यांच्यासह मदन पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या तीन माजी आमदारांचा समावेश आहे.
- जतचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू संग्रामसिंह, माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज, दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांचे बंधू गणपती सगरे, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे बंधू उदयसिंह देशमुख अशा सग्यासोयऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील (मांजर्डे) यांच्या पत्नी कमलताई पाटील व माजी अध्यक्ष सिकंदर जमादार यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
- शिराळ्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव चरापले यांच्या स्नुषा श्रद्धा चरापले, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे प्रमुख दिलीप तात्या पाटील, ढालगावचे माजी जि. प. सदस्य चंद्रकांत हाक्के, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बाळासाहेब व्हनमोरे, सांगलीचे नगरसेवक विष्णू माने यांनाही या आघाडीत संधी मिळाली आहे.
मदनभाऊ - विशाल पाटील आमने-सामने
- मिरज सोसायटी गटातून वसंतदादा घराण्यातील मदन पाटील व विशाल पाटील या चुलत बंधूंमध्ये लढत होत आहे. मागीलवेळी विशाल पाटील यांचा एका मताने सिकंदर जमादार यांनी पराभव केला होता.
- यंदा दोन्ही बंधू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मदन पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीत विशाल पाटील यांच्यासाठी आग्रह धरला होता, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशाल यांच्या नावाला विरोध केल्याने त्यांची उमेदवारी कापली गेली.
आर. आर. गटात नाराजी
- आर. आर. पाटील यांच्या गटाला सर्वपक्षीय आघाडीत चार जागा मिळाल्या. त्यात त्यांचे बंधू सुरेश पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या पत्नी कमलताई पाटील, कवठेमहांकाळमधून गणपती सगरे व चंद्रकांत हाक्के यांचा समावेश आहे.
- या गटातून मोहन माळी यांच्यासह अनेकजण इच्छुक होते; पण त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात निराशा पसरली. माळी यांनी सुरेश पाटील यांना खडे बोलही सुनावले. याच गटातील डी. के. पाटील, अविनाश पाटील, शंकरदादा पाटील यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. आर. आर. आबा असते, तर असे घडलेच नसते, अशी प्रतिक्रिया उमटत होती.