इस्लामपूर पालिकेच्या गाळ्यात बेकायदेशीर शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:33+5:302020-12-11T04:54:33+5:30
इस्लामपूर : येथील अंबाबाई उद्यानालगत नगरपालिकेने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांत काहींनी बेकायदेशीर शिरकाव केल्याचे निदर्शनास आले. याची चौकशी करावी, असे ...

इस्लामपूर पालिकेच्या गाळ्यात बेकायदेशीर शिरकाव
इस्लामपूर : येथील अंबाबाई उद्यानालगत नगरपालिकेने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांत काहींनी बेकायदेशीर शिरकाव केल्याचे निदर्शनास आले. याची चौकशी करावी, असे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना दिले. पालिका प्रशासनाने या गाळ्यातील साहित्य बाहेर काढून हे गाळे सील केले आहेत.
गेल्या आठवड्यापासून जयंत पाटील प्रत्येक प्रभागात बूूथ कमिटीच्या बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या बैठकीस तहसीलदार रवींद्र सबनीस आणि मुख्याधिकारी माळी उपस्थित असतात. बुधवारी सायंकाळी उशिरा संभुआप्पा मंदिरानजीक बैठक पार पडली. या बैठकीत बऱ्याच नागरिकांनी पालिकेने गेल्या पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या व्यापारी गाळ्यांबाबत तक्रारी केल्या. या गाळ्यांचा लिलाव झाला नाही. बेरोजगारांना हे गाळे द्या, हे गाळे काहींनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहेत, अशा तक्रारी केल्या. यावर पाटील यांनी या प्रकाराची चौकशी करावी आणि पालिकेने मालमत्ता ताब्यात ठेवावी, असे आदेश मुख्याधिकारी माळी यांना दिले. यावर पालिका प्रशासनाने चौकशी केल्यानंतर काही गाळ्यांमध्ये बेकायदेशीर साहित्य असल्याचे निदर्शनास आले. यावर पालिका प्रशासनाने हे साहित्य बाहेर काढून काही गाळ्यांना सील केले आहे.
चौकट
गाळे लिलावाविना पडून
इस्लामपूर शहरात पालिकेच्यावतीने तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने व्यापारी गाळे बांधले आहेत. यातील बहुंताशी गाळे नेत्यांच्या बगलबच्चांनी घेतले आहेत. हेच गाळे इतरांना भाड्याने दिले आहेत. काही गाळे बेकायदेशीरपणे दिल्याची चर्चाही आहे. बरेच गाळे लिलावाविना पडून आहेत.
फोटो १०१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
फोटो ओळ : इस्लामपूर पालिका प्रशासनाने व्यापारी गाळ्यात बेकायदेशीर ठेवलेले साहित्य बाहेर काढून गाळे सील केले आहेत.