विट्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: May 27, 2015 01:00 IST2015-05-26T22:56:51+5:302015-05-27T01:00:17+5:30

नापास होण्याच्या भीतीने कृत्य : आजच निकाल होणार जाहीर!

Hrithik's wife committed suicide | विट्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

विट्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

विटा : मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या रचना सतीश दंडवते (वय १८, रा. यशवंतनगर, विटा, मूळ गाव हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव) या विद्यार्थिनीने घरी ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. बारावीचा एक पेपर अवघड गेल्याने नापास होण्याच्या भीतीने रचनाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विटा पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सतीश दंडवते यांची ती कन्या आहे. या घटनेने विटा शहरासह कडेगाव व खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हिंगणगाव खुर्द येथील सतीश दंडवते कुटुंबियांसमवेत विटा येथे राहतात. त्यांची कन्या रचना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. तिने मार्चमध्ये परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला एका विषयाचा पेपर अवघड गेला होता. बुधवार, दि. २७ रोजी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. मात्र अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीखाली ती कायम वावरत होती.
मंगळवारी सकाळी आई, वडील, भाऊ व रचना कऱ्हाड येथे नातेवाईकांकडे जाणार होते. त्यांची तयारी सुरू होती. रचना बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला बाहेर बोलाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिने ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात नेले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर आहे. या घटनेने विटा शहरात खळबळ उडाली होती. बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होणार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)


‘आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये’
घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’, असा मजकूर लिहिला आहे.

Web Title: Hrithik's wife committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.