कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानीही त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:41+5:302021-05-01T04:24:41+5:30

सांगली : कोरोनाच्या महामारीत एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना काही घटनांनी समाजमन सुन्न होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अनेकांना ...

He was also denied blood ties after Corona's death | कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानीही त्यांना नाकारले

कोरोना मृत्यूनंतर रक्ताच्या नात्यानीही त्यांना नाकारले

सांगली : कोरोनाच्या महामारीत एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना काही घटनांनी समाजमन सुन्न होत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर अनेकांना रक्ताच्या नात्यानीही नाकारल्याची उदाहरणे समोर येत आहे. अशा वेळी स्मशानभूमीतील कर्मचारी, शववाहिकाचालकांकडून अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली आहे. नात्यातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी संपली की काय? असा प्रश्न पडणाऱ्या घटनाही घडत आहेत.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. गेली वर्षभर कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले असताना सख्खी नाती दुरावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण, त्याच्या नातेवाइकांना रक्त्याच्या नात्यापलिकडील लोक मदतीचा हात देत आहेत, तर दुसरीकडे अनेकांच्या वाट्याला मात्र नात्याचे प्रेमही मिळत नाही. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेलेले नाहीत. काही जणांनी अग्निविधीलाही नकार दिला. अशावेळी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचारी, शववाहिकेवरील चालकांनी अंत्यविधीचे सोपस्कर पार पाडले आहे. काही जणांनी तर रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीकडे पाठवून घरी गेल्याचे समोर आले आहे. या घटनांनी समाजमन मात्र सुन्न झाले आहे.

चौकट

अंत्यविधीला परवानगी. मृताच्या नशिबी तेही नाही

महापालिकेने मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ठेकेदारही नियुक्त केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अविरत हे काम सुरू आहे. अंत्यविधीसाठी नातेवाइकांना पीपीई किट घालून परवानगी दिली जाते. काही जण पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करतात. त्यानंतर ते पीपीई किट काढून जाळून टाकले जाते. तर अनेक जणांचे नातेवाईकच अंत्यसंस्कारासाठी येत नाहीत. काहींचे स्मशानभूमीत येतात; पण अंत्यसंस्काराला नकार देतात. मृताच्या नशिबी नात्यातील लोकांकडून अंत्यसंस्काराचे सोपस्कारही नाहीत.

चौकट

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर परजिल्हा, परराज्यातील ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत मृत झालेल्या कोविड रुग्णावर मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची मोफत व्यवस्था केली आहे.

चौकट

कोट

महिन्याकाठी आठ ते दहा मृतदेहांवर आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. अनेक नातेवाईक तर रुग्णालयात मृतदेह सोडून गेले होते. काही वेळ नातेवाइकांची वाट पाहून अंत्यसंस्कार करतो. वाईट वाटते; पण आमचाही नाईलाज असतो. - पिंटू माने

चौकट

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक ज‌वळही येत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. अनेक जण स्मशानभूमीत येतात; पण अग्नी देण्यासाठी पुढे येत नाहीत. अशावेळी त्यांच्या परवानगीने आम्हीच अंत्यसंस्कार करतो. -

चौकट

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू : २२४२

महापालिकेकडून केलेले अंत्यविधी : २०००

रुग्णांवर महापालिकेकडून केलेले अंत्यसंस्कार : ९० टक्के

Web Title: He was also denied blood ties after Corona's death