शहरातील दोन कोटीच्या जागांचे आरक्षण उठविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:24+5:302020-12-11T04:54:24+5:30
सांगली : तत्कालीन नगरपालिकेपासून महापालिका काळात भूखंडमाफिया, कारभारी आणि प्रशासनाने शहराच्या हिताच्या अनेक भूखंडांचा बाजार केला. आता पुन्हा भूखंडमाफिया ...

शहरातील दोन कोटीच्या जागांचे आरक्षण उठविण्याचा घाट
सांगली : तत्कालीन नगरपालिकेपासून महापालिका काळात भूखंडमाफिया, कारभारी आणि प्रशासनाने शहराच्या हिताच्या अनेक भूखंडांचा बाजार केला. आता पुन्हा भूखंडमाफिया सक्रिय झाले आहेत. कुपवाड, विश्रामबागमधील दोन कोटीहून अधिक रुपयांच्या जागांचे आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. हा डाव उधळून लावू, असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.
ते म्हणाले, महापालिकेच्या विकास आराखड्यात ६५० पेक्षा अधिक आरक्षित भूखंड होते. या भूखंडांचा बाजार झाला आहे. कुपवाड येथील सात एकर जागेपैकी अडीच एकर जागेवर प्रायमरी स्कूलचे आरक्षण आहे. आरक्षण क्र. ३३८ ही जागा क्रीडांगणाचे आरक्षण असलेली आहे. परंतु गुंठेवारीतून तेथे घरे झाल्याचे कारण पुढे करून ते उठविण्याचा घाट घातला आहे.
गुंठेवारी कायद्यानुसार ९९ टक्केपेक्षा अधिक घरे झाली आहेत, त्या जागेचेच आरक्षण उठू शकते. पण सध्या जागेवर ३० टक्केपेक्षा कमी घरे आहेत. सात एकरात केवळ १७ प्लॉट पाडल्याचे दाखविले आहे. त्यामुळे आरक्षित अडीच एकरात किती घरे, प्लॉट आहेत याचाही विषयपत्रात उल्लेख नाही. काही आजी-माजी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड वर्षाने हे विषयपत्र सभेसमोर आणले आहे. ऑनलाईन सभेत हा भूखंडबाजार करून शहराचे वाटोळे करण्याचा घाट सुरू आहे.
विश्रामबाग येथील ७५ गुंठे जागेवर प्ले ग्राऊंडचे आरक्षण होते. ते उठविण्याचाही घाट भूखंडमाफियांनी घातला आहे. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात विषयपत्र तयार झाले होते. परंतु ते आजपर्यंत महासभेसमोर आले नाही. तेथे कोणत्याही प्रकारे नागरी वस्ती झाली नाही. यासंदर्भात हरकती मागविण्याची मुदत ३ डिसेंबरअखेर होती. परंतु हे विषयपत्र काचपेटीत त्यानंतर लावले आहे. महापालिकेचा हा डाव उधळण्यासाठी आता जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला.
भूखंडमाफिया सक्रिय
साखळकर म्हणाले, तत्कालीन काँग्रेस सत्तेत आरक्षण उठविण्याचा घाट घातला गेला. पण राज्यात भाजप महायुतीचे सरकार असल्याने ते महासभेसमोर आणले नव्हते. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने प्रशासन, कारभारी आणि भूखंडमाफिया सक्रिय झाले आहेत.