घाटमाथ्यावरील लेकींनी रोवला यशाचा झेंडा
By Admin | Updated: May 25, 2016 23:34 IST2016-05-25T22:58:38+5:302016-05-25T23:34:26+5:30
जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे.

घाटमाथ्यावरील लेकींनी रोवला यशाचा झेंडा
सांगली : कवठेमहांकाळच्या उत्तरेला दिसणाऱ्या डोंगरांच्या भल्यामोठ्या रांगा आणि भीषण दुष्काळाचा सामना करत असताना, शिक्षणाचे स्वप्न विरून जाण्याच्या परिस्थितीवर मात करत तिसंगीच्या आरती आनंदराव भोसले व कुंडलापूरच्या अस्मिता अनिल देशमुख या विद्यार्थिनींनी बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ८१ टक्के व ८० टक्के गुण मिळवत आदर्श निर्माण केला आहे. आरतीने अकौंटस्मध्ये ९४ गुण मिळवले आहेत, तर अस्मिताने अर्थशास्त्रासारख्या अवघड विषयात ८८ गुण मिळवले आहेत. आता यापुढे हार न मानता सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन सेवेत जाण्याचा आत्मविश्वास अस्मिताने व्यक्त केला, तर बॅँकिंग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे आरतीने सांगितले. जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे. या परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला शाळेस पाठविण्यासही पालक धजावत नसताना, पालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत या दोघींनी बारावीत यश मिळविले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, कुंडलापूर ही गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करतात. मात्र, याचा बाऊ न करता, या गावांतील दोघींनी एकत्रच कवठेमहांकाळ येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली. यात पूर्णत: पावसाच्या भरवशावरच शेती असलेल्या शेतकरी कुटुंबातील अस्मिताने मिळविलेले गुण शहरातील पालकांना किंवा अभ्यासकांना थोडेफार कमी वाटत असले तरी, कुंडलापूर ते कवठेमहांकाळ असा दैनंदिन प्रवास करीत आणि घरी गेल्यानंतर पालकांना मदत करीतच तिने बारावी पूर्ण केली आहे. कुंडलापूर येथे केवळ सातवीपर्यंतचीच शाळा उपलब्ध असल्याने तिने आठवी ते दहावीचे शिक्षणही शेजारच्या तिसंगी येथे पूर्ण केले. आरतीची बारावीही याच परिस्थितीत पूर्ण झाली आहे. कुटुंबाच्या पाठबळावर बारावी पूर्ण करीत असतानाच शेतकरी कुटुंबातील या सावित्रीच्या लेकींनी क्षमता तर सिध्द केलीच, शिवाय केवळ परिस्थितीचा बाऊ करीत ध्येय अर्धवट सोडणाऱ्यांसमोर आदर्शही निर्माण केला आहे. या दोघींना वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक यांची साथ लाभली. (प्रतिनिधी)
अस्मिताला व्हायचंय अधिकारी
अस्मिताला भविष्यात सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल, असे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठीच तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा मनोदय बोलताना व्यक्त केला. प्रशासनात जाऊन गरजूंची अडचण दूर करण्याचे ध्येय असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
$$्निरात्र महाविद्यालयाचे यश
सांगलीच्या एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यंदाच्या बारावी परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. कला शाखेचा निकाल ७५.८६ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. या कॉलेजच्या अपर्णा जाधवने कला शाखेत ७५.५३ टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीतही चांगले यश मिळवले आहे.