गदिमा कविता महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:54+5:302021-01-19T04:27:54+5:30

माडगुळे (ता. आटपाडी) येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि गदिमा प्रतिष्ठान-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ...

Gadima Poetry Festival is a festival of culture of Maharashtra | गदिमा कविता महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महोत्सव

गदिमा कविता महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महोत्सव

माडगुळे (ता. आटपाडी) येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि गदिमा प्रतिष्ठान-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित २८ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटक खासदार श्रीनिवास पाटील, स्वागताध्यक्ष सुदाम भोरे, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, अमरसिंह देशमुख, प्रबुद्धचंद्र झपके, विजय कोलते प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील (जन्मशताब्दी सन्मान), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रसिकाग्रणी उल्हास पवार (जीवनगौरव सन्मान), महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (मृत्युंजय साहित्य पुरस्कार), लोककलावंत वैशाली काळे- नगरकर (लोककला पुरस्कार), प्रगतशील शेतकरी पांडुरंग लाडे (कृषिभूषण पुरस्कार), वैजिनाथ घोंगडे (माणगंगा भूषण पुरस्कार) यांचा सन्मान करण्यात आला. आटपाडी एज्युकेशन सोसायटी, माडगुळेतील ग. दि. माडगूळकर हायस्कूल आणि नाझरा विद्यामंदिर प्रशाला या संस्थांना गदिमा संस्कारक्षम शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले.

साहेबराव ठाणगे लिखित 'पाऊसपाणी', विनायक पवार लिखित 'नामुष्कीचे पिढीजात वर्तमान', देवा झिंजाड लिखित 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे !' आणि श्रीनिवास मस्के लिखित 'गावभुईचं गोंदण' या कविता संग्रहांना गदिमा साहित्यसन्मान प्रदान करण्यात आले.

गदिमांच्या लेखनाचे आवडते ठिकाण 'बामणाचा पत्रा' येथून कार्यक्रम स्थळापर्यंत पालखीसह साहित्यदिंडी काढण्यात आली. वृक्ष पूजनाने आणि गदिमांची पणती पलोमाच्या गदिमा गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले.

उद्घाटक श्रीनिवास पाटील यांनी खास ग्रामीण शैलीत गदिमांची अनेक वैशिष्ट्ये सांगितली; तर सत्काराला उत्तर देताना उल्हास पवार म्हणाले की, ‘वेदमंत्रांहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम्' लिहिणारे गदिमा खऱ्याअर्थाने राष्ट्रवादाचे प्रतीक होते. समाज अभिसरणाचे सुंदर दर्शन त्यांच्या रूपाने पंचवटीत वावरत होते. प्रा. दिगंबर ढोकले आणि प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

निमंत्रितांच्या कविसंमेलनात नारायण पुरी, अरुण पवार, शिवाजी बंडगर, सुधीर इनामदार, डॉ. अनिल काळबांडे, वर्षा बालगोपाल, निशिकांत गुमास्ते, मदन देगावकर, डॉ. संजीवनी केसकर-पिंगळे आणि रवी कांबळे यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी उद्धव कानडे होते. भरत दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले.

सरपंच संजय विभुते, मुरलीधर साठे, सादिक खाटीक, सुरेश कंक, बाजीराव सातपुते, काशिनाथ नखाते, मुकुंद आवटे, राजेंद्र वाघ उपस्थित होते.

चौकट

माडगुळे येथे स्मारक करा

शेटफळे येथे शासनाच्यावतीने उभारण्यात येत असलेले गदिमांचे स्मारक पूर्ण करावे. माडगुळे येथे स्मारकासाठी आम्ही एक एकर जमीन देऊ. तेथे भव्य स्मारक उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी दिली.

फोटो-१८०१२०२१आटपाडी०१ : माडगुळे (ता. आटपाडी) येथे राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे उद्घाटन खा. श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी डावीकडून सुमित्र माडगूळकर, प्रा. मिलिंद जोशी, श्रीपाल सबनीस, पी. डी. पाटील, पुरुषोत्तम सदाफुले उपस्थित होते.

Web Title: Gadima Poetry Festival is a festival of culture of Maharashtra