देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे स्वातंत्र्य गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:55+5:302021-01-13T05:10:55+5:30
शिराळा : शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळणे, हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू ...

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे स्वातंत्र्य गरजेचे
शिराळा : शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळणे, हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
शिराळा येथील विवेकानंद व्याख्यानमालेत डॉ. शिर्के बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन होते.
येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या यावर्षीच्या व्याख्यानमालेतील पहिले
पुष्प डॉ. शिर्के यांनी गुंफले. यावेळी सुमंत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिर्के म्हणाले, समाजाशी नातं जोडणं त्यांच्या विषयावर चिंतन करणे, हे कुलगुरूंचे कर्तव्य आहे. शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळणे, हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार अनेक बदल अपेक्षित आहेत. अजूनही समाजातील ७४ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. फक्त आपण शंभरातील २५-२६ नजरांनाच उच्च शिक्षण देतोय. हे नक्कीच अभिमानास्पद बाब नाही. हा टक्का वाढला पाहिजे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. अलीकडील काही वर्षात शैक्षणिक संस्थांचे देशात पीक आलंय. दहा हजारांपेक्षा अधिक विद्यापीठे आणि ४० हजारांपेक्षा अधिक महाविद्यालय आहेत. पण गुणात्मक वाढ फारशी दिसून येत नाही. सोयी सुविधा, विद्यार्थीसंख्या याबाबत फारच गंभीर स्थिती आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुशाखीय शैक्षणिक संस्थांचा आणि महाविद्यालयांची निर्मिती करावी लागणार आहे. हे धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तयार केले आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तारण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मुख्य विषयाबरोबरच इतर विषयांचे ज्ञानार्जन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संशोधनाची समाजाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचे आहे. प्रादेशिक भाषेत शिक्षणाची मुभा असणारे या धोरणाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे.
यावेळी प्राचार्य जयसिंगराव पवार, डॉ. पी. बी. कुलकर्णी, डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, सुखदा महाजन, वैभवी कुलकर्णी, सतीश काकडे आदी उपस्थित होते.