सांगली : खटले निर्दोष सुटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलिस ठाणेनिहाय आढावा घ्यावा. यातील त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल्या.पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अपर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहूरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, अपर अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषसिद्धी वाढवावी. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. जिल्ह्यामध्ये दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे. मालमत्ताविषयक गुन्ह्यांत हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी.
ते म्हणाले, महिला बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यांत निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा. दाखल गुन्हे, किती महिला परत आल्या, याचे पोलिस ठाणेनिहाय ‘ट्रॅकिंग’ करावे. यासाठी विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा. नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पोलिस दल या यंत्रणा समन्वयाने संभाव्य महापूर परिस्थितीत कामगिरी पार पाडतील, अशी ग्वाही दिली.
अधीक्षक घुगे यांनी पोलिस दलाच्या कामगिरीविषयक सादरीकरण केले. नावीन्यपूर्ण उपक्रम, विशेष कामगिरी, पोलिस दलाचे कल्याणकारी उपक्रम, जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेले उपक्रम आणि आव्हानांची माहिती सादर केली.