वंचित भागातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:31+5:302021-02-20T05:16:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही ...

वंचित भागातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव व खानापूर तालुक्यातील जाधवनगर, बलवडी, पलूस तालुक्यातील कुंडलचा काही भाग व कोयना वसाहत, पलूस व आंधळी आदी गावांच्या दोन हजार ४०४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणाऱ्या ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक दोनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे वितरिकेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्नही साकार होत आहे. आता २१ फेब्रुवारी रोजी ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होत आहे. यानंतर
लवकरच या वितरिकेची चाचणी होणार आहे. यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनाही या चाचणीची उत्सुकता लागली आहे.
वंचित भागातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या वितरिकेसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. त्यांच्या कार्यकाळात या वितरिकेला मंजुरी
मिळाली होती. २००५ मध्ये आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजनही झाले होते.
भूसंपादनामधील तक्रारीमुळे या वितरिकेच्या कामाला काही शेतकऱ्यांचा विरोध होता. यामुळे वर्षानुवर्षे हे काम रखडले होते. यावर मार्ग काढण्यासाठी ९ किमी लांबीच्या मुख्य वितरिका व १६ किमी लांबीच्या उपवितरिकांसाठी बंदिस्त पाईपलाईन करण्याचा २०१८ मध्ये
शासन स्तरावर निर्णय झाला. भूसंपादन होणारच नसल्याने शेतकऱ्यांचा विरोधही संपला.
बंदिस्त पाईपलाईनसाठी खुदाई करताना झालेली शेतकऱ्यांची पीक व अन्य नुकसानभरपाई शासनाकडून
बहुतांशी शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित ११ कोटी ८२ लाखांच्या निधीतून हे काम पूर्ण झाल्याने या वितरिकेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खुदाई काम करताना झालेल्या पीक नुकसानभरपाईबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असून, त्या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट
चेंबरद्वारे मिळणार पाणी
मुख्य वितरिकेला जोडलेल्या उपवितरिकांमधून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्रातील आठ गावांमधील वेगवेगळ्या २८ ठिकाणच्या शिवारात जागोजागी चेंबरद्वारे पाणी दिले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ८० ते १०० हेक्टर शेतजमिनीला पाणी देणार आहेत.
फोटो ओळ :
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) हद्दीत ताकारी योजनेच्या मुख्य कालव्याला जोडलेल्या क्रमांक दोनची सुरुवात या ठिकाणी होते.