नेवरीतील बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुरेच
By Admin | Updated: August 29, 2014 23:11 IST2014-08-29T21:38:21+5:302014-08-29T23:11:58+5:30
तीनवेळा पूजन : शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी

नेवरीतील बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुरेच
गणेश पवार - नेवरी --नेवरी (ता. कडेगाव) येथील येरळाकाठावरील महादेव मंदिराजवळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे आतापर्यंत दोन ते तीनवेळा पूजन झाले आहे. अद्याप त्या ठिकाणी बंधाऱ्याचे काम सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे या नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुऱ्या अवस्थेत राहिले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.
येरळा नदीवरील महादेव मंदिराजवळ शासकीय अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी होऊनही बरीच वर्षे लोटली. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना काम पूर्ण होणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले. याठिकाणी मातब्बर नेत्यांनी प्रत्यक्ष वाजत गाजत येऊन श्रीफळ वाढवून बंधाऱ्याचा प्रारंभ केला. गेल्या दहा वर्षांपूर्वी महादेव मंदिराजवळील या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांसाठी हा एक फार्स झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बऱ्याचदा संबंधित अधिकाऱ्यांकडे या बंधाऱ्याची चौकशी केली असता, निधी उपलब्ध नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बरीच वर्षे लोटली असतानाही या शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या पाण्यावर स्वत:च्या खर्चातून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाईपलाईन केल्या आहेत. विविध बॅँकांतून कर्जे घेऊन शेतीमध्ये ऊस लागवडी केल्या आहेत. या बंधाऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असून अजून अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. मात्र प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे महादेव मंदिराजवळील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे नशीब कधी उघडणार, अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे. या ठिकाणी बंधाऱ्याचे काम न झाल्याने वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. हा बंधारा नेवरीतील शेतकऱ्यांसाठी एक चर्चेचा विषय बनला असून हा बंधारा होणार की नाही, याकडे लक्ष वेधले आहे. येरळाकाठावरील तुपेवाडी, येतगाव, भिकवडी खुर्द, विठ्ठलनगर, ननवरे मळा याही भागातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. संबंधित खात्याने वेळीच लक्ष देऊन निधी उपलब्ध करून या बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.