जिल्हा बँकेला १२७ कोटीचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:44+5:302021-04-10T04:26:44+5:30
सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश ...

जिल्हा बँकेला १२७ कोटीचा ढोबळ नफा
सांगली : शेतकरी कर्जमाफी आणि कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा बॅँकेने उत्कृष्ट काम केल्याने राज्यातील पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे. या वर्षात १२७ कोटी ४७ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वर्षअखेर १२ हजार कोटीपर्यंत व्यवसाय गेला आहे.
पाटील म्हणाले की, बँकेच्या भागभांडवलात गतवर्षीपेक्षा ७.५३ टक्के वाढ आहे. मागील वर्षी ५८०० कोटी ८२ लाख ९३ हजाराच्या ठेवी होत्या. यंदा यात १०.७३ टक्के वाढ होऊन ठेवी ६४२३ कोटी ५४ लाख ७६ हजारापर्यंत गेल्या आहेत. बाहेरील कर्जे २७.१ टक्के वाढीव घेतली आहेत. ही रक्कम ८३१ कोटी ५२ लाख आहे. गुंतवणुकीत १३.८९ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ११४२ कोटी रुपयांची कर्जे जादा दिली आहे. एकूण ५३५६ कोटी ८४ लाख कर्जाचे वाटप केले आहे. १२७ कोटी ४७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीपेक्षा ३७.९७ टक्के वाढ आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची वसुली कमी झाली आहे. कोरोनाचा बॅँकेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे.
उपाध्यक्ष देशमुख म्हणाले, बँकेच्या प्रतिकर्मचारी व्यवसायात यंदा २१.३६ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने एक कोटी ६० लाखांचा व्यवसाय केला आहे. एनपीएचे प्रमाण ११.९४ टक्केवरून ११.९८ टक्के झाले आहे. एकूण व्यवसाय १२ हजार कोटीपर्यंत झाला आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, जे. जे. पाटील उपस्थित होते.
चौकट
लवकरच पहिल्या क्रमांकावर
जिल्हा बँकेने केलेल्या चांगल्या कारभारामुळे सध्या बँकेचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. बँक कार्पोरेट पध्दतीने चालविण्याचा प्रयत्न आहे. काहींची थकबाकी वसूल झाली की, बँक राज्यात पहिल्या क्रमांकावर जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.