विकासाभिमुख नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:40+5:302021-01-04T04:22:40+5:30
प्रदीर्घ काळ संघर्षाची वाट चालत असताना, विकासकामांशी असलेले नाते कधीही न तोडण्याची सवय संजयकाका पाटील यांनी अंगिकारली. त्यामुळे अपयशाचे ...

विकासाभिमुख नेतृत्व
प्रदीर्घ काळ संघर्षाची वाट चालत असताना, विकासकामांशी असलेले नाते कधीही न तोडण्याची सवय संजयकाका पाटील यांनी अंगिकारली. त्यामुळे अपयशाचे अनेक अडथळे पार करीत वाटेवर यशाचा सुगंधी बहरही त्यांनी स्वकर्तृत्वाने फुलविला. हा बहर कालांतराने विकासकामांतून सामान्य जनतेच्या घरांमध्येही दरवळू लागला. पदे मिळाली की जनतेची साथ सोडणाऱ्या अनेक राजकारण्यांच्या पंक्तीत न बसता संजयकाकांनी पदांचा उपयोग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी कसा होईल, याचा विचार केला. सभागृहात लांबलचक व प्रभावशाली भाषणे झाडण्यापेक्षा विविध खात्यांच्या मंत्र्यांशी सुसंवाद साधून त्यांच्याकडून जिल्ह्यासाठी काही तरी विकासकामे पदरात पाडून घेण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत सिंचन, उद्योग, रेल्वे, महामार्ग अशा विविध विभागांतील निधी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आणण्यात त्यांना यश आले. ड्रायपोर्टसाठी त्यांनी केलेले भरीव प्रयत्न जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची नांदी ठरणार आहे.
खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कामांचा धडाका जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवला असला तरी, अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना भावनिक साथ देण्याचे कामही त्यांनी केले. अपघातात मृत झालेल्या पैलवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी त्यांनी केलेली भावनिक धडपडही लोकांना भावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांच्या बांधापर्यंत जाऊन अश्रू पुसण्याचे कामही संजयकाका पाटील यांनी केले. शेतकरी या घटकाशी सर्वांत जास्त जोडलेले नेतृत्व म्हणूनही त्यांना ओळखले जाते. शेतीचा विकास हा सर्वस्वी सिंचनावरच अवलंबून असल्यामुळे रखडलेल्या सिंचन योजनांना हत्तीचे बळ देऊन कार्यान्वित करण्याचे काम त्यांनी केले.
टीका करण्यापेक्षा कामातून नाती जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच अल्पावधीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांच्या कामाचा डंका वाजला. कामाचा गाजावाजा करण्यापेक्षा लोकांपर्यंत ती माहिती पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. ज्या कामासाठी लोकांनी निवडून दिले, त्या कामाची पूर्तता करण्याचेच ध्येय बाळगून त्यांनी धडपड केली. नावाला वचननामे करून निवडणुकीची औपचारिकता पार पाडणाऱ्या राजकारण्यांपेक्षा वचननामे पूर्ण करून पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने लोकांसमोर जाणे त्यांनी पसंत केले.
लोकप्रतिनिधी म्हणून संजयकाका पाटील यांनी सामान्य लोकांशी व विविध क्षेत्रांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. मतदारसंघातील असे एकही गाव नसेल, जिथे संजयकाका पोहोचले नाहीत. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या सुख-दु:खाची चौकशी करून, त्यांच्यासोबत असल्याचे सांगत त्यांना आधार देण्याची त्यांची शैली अनेकांना भावते. त्यांची सलगी जशी सामान्य माणसाशी आहे, तशीच ती पक्षीय पातळीवरील सर्व नेत्यांशीही आहे.
राज्य आणि केंद्रातील अनेक मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या दालनात थेट जाऊन कोणत्याही प्रश्नाबाबत चर्चा करण्याचा हक्क ते अबाधित ठेवून आहेत. अविश्रांतपणे विकासकामांसाठी ते धडपड करीत राहिल्याने जनतेच्या पदरात बरेच काही पडले. सिंचनाचा आज जो काही हिरवागार व जलमय परिणाम दुष्काळी भागात दिसत आहे, त्यामागे संजयकाकांची धडपड आहे.
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, मिरज रेल्वेस्थानकावर लोकोमोटिव्ह वर्कशॉप विकसित करण्याबाबत आणि सांगली रेल्वेस्थानक येथे नवीन पिटलाईन तयार करण्याबाबतची मागणी संजयकाका पाटील यांनी महाप्रबंधक एस. के. शर्मा यांच्याकडे करून सातत्याने त्यासाठीचा पाठपुरावा सुरू ठेवला. रेल्वेसंबंधी अनेक प्रश्न मार्गी लावताना जिल्ह्यातील रेल्वेसेवा अधिकाधिक विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.
गतीने धावणाऱ्या एखाद्या एक्स्प्रेसप्रमाणेच जिल्ह्यात विकासकामांच्या रुळांची उभारणी करून त्यावरून सातत्याने गतीने धावणारी एक्स्प्रेस म्हणूनच संजयकाकांची ओळख होत आहे.
- संतोष आठवले