चिकुर्डे प्रकल्पग्रस्तांच्या जागेबाबत आदेश रद्दची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:22+5:302021-04-09T04:29:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील धरण, अभयारण्यग्रस्त पुनर्वसन वसाहतमधील माळी समाज दफनभुमी गट नंबर ...

चिकुर्डे प्रकल्पग्रस्तांच्या जागेबाबत आदेश रद्दची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील धरण, अभयारण्यग्रस्त पुनर्वसन वसाहतमधील माळी समाज दफनभुमी गट नंबर ९/१ चा आदेश त्वरित रद्द करावा, असे निवेदन खुंदलापूर, टाकळे, झोळंबी, शेंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेतकरी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गौरव नायकवडी तसेच तहसीलदार रवींद्र हसबनीस यांना दिले. दरम्यान, शुक्रवार ९ रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्याची ग्वाही गौरव नायकवडी यांनी ग्रामस्थांना दिली.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मूळचे खुंदलापूर, टाकळे, झोळंबी, शेंडगेवाडी येथील रहिवासी होतो. या सर्व प्रकल्पग्रस्तांचे चिकुर्डे येथे पुनर्वसन झालेले आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यावतीने या सर्वांना भूखंड दिले आहेत. याच भूखंडापैकी क्रमांक ५६, ५७, ५८, ६०, ५९, ६८, ६९, ७१, ७२ या जागेवर प्रकल्पग्रस्तांची पक्की घरे आहेत. ही जागा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या नावे असताना सन २००० मध्ये चिकुर्डे गावातील पुढारी मंडळी व माळी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी माळी समाजाच्या दफनभुमीसाठी जागा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने सात-बारावर नोंद करून घेतली आहे. हा प्रकल्पग्रस्तांवर मोठा अन्याय आहे.
दोन दिवसांपासून माळी समाजातील लोकांनी या भूखंडामध्ये जेसीबीच्या साह्याने नूतनीकरण सुरू केले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी दिलेला माळी समाज दफनभुमी भूखंड नंबर ९/१ चा आदेश त्वरित रद्द व्हावा, अशी मागणी केली आहे.
चौकट....
दोन गटात वाद
माळी समाजाच्यावतीने या ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे. या नूतनीकरणास विरोध म्हणून येथील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी येथील काम बंद पाडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही घटनांत शांतता पाळण्याचे आवाहन केले.