टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:34+5:302020-12-12T04:42:34+5:30

टेंभू योजनेचे आवर्तन मागील महिन्यातच मिळणे गरजेचे होते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे आवर्तनास विलंब होत आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी ...

Delay the rotation of the Tembhu scheme | टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

टेंभू योजनेचे आवर्तन मागील महिन्यातच मिळणे गरजेचे होते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे आवर्तनास विलंब होत आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात पाण्याची टंचाई भासली नव्हती. परंतु सध्या पाणी पातळी खालावल्याने शेतीच्या पाण्याची शेतकऱ्यांना मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यात सध्या पाण्याअभावी नदी, बंधारे, ओढे काेरडे पडू लागले आहेत. पाण्याअभावी ऊस, पिके वाळू लागली आहेत. डोळ्यासमोर पिके वाळत असल्याने शेतकरी हतबल बनला आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असून पाण्याअभावी वजनात तूट येत आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ऊस, द्राक्षबागा, फळभाज्या आदी पिकांना पाण्याची गरज आहे. यावर्षी गहू, शाळू, तसेच हरभरा आदी रब्बी हंगामातील पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याअभावी ही पिके कशी जगवायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कडेगाव तालुक्यातील येरळा, नांदणी नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. पाण्याअभावी विहिरी, बंधारे, ओढे यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणे गरजेचे आहे.

चौकट

ऊस बिलातून पाणीपट्टी कपात

कडेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी टेंभू योजनेकडून पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टेंभू योजनेची पाणीपट्टी कपात करून घेतली जाते. त्यामुळे आवर्तनही विहित वेळेत मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Delay the rotation of the Tembhu scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.