गोपनीयता, गोंधळचक्रात महायुतीचे इच्छुक
By Admin | Updated: August 28, 2014 23:04 IST2014-08-28T22:49:48+5:302014-08-28T23:04:19+5:30
विधानसभा निवडणूक : अनिश्चिततेच्या भोवऱ्यात राजकीय स्वप्ने

गोपनीयता, गोंधळचक्रात महायुतीचे इच्छुक
अविनाश कोळी-सांगली -काँग्रेस आघाडीत रितसर पक्षीय नियमांप्रमाणे मुलाखतींचे कार्यक्रम पार पडले असताना, महायुतीत मात्र, गोपनीयता व गोंधळचक्रात इच्छुकांची स्वप्ने फिरत आहेत. भाजपने अर्ज व मुलाखतींबाबत गोपनीयता बाळगली आहे, तर शिवसेनेत थेट सेना भवनातून तिकीटनिश्चिती केली जात आहे. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या आरपीआय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागाच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांच्याकडील इच्छुकांचे वांदे झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे एकूण ५३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्या मुलाखतींचे पक्षीय स्तरावर स्वतंत्र कार्यक्रम पार पडले आहेत. जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी, या दोन्ही पक्षांनी निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. महायुतीत मात्र गोंधळाचे वातावरण दिसत आहे. भाजपकडे सांगली जिल्ह्यातून आठही मतदारसंघांसाठी एकूण अंदाजे ३५ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात दाखल झालेले अर्ज आणि इच्छुकांच्या मुलाखती याबाबत पक्षीय स्तरावर गोपनीयता बाळगण्यात आल्याचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या गोपनीयतेचे कारण त्यांना देता आले नाही. शिवसेनेत अजूनही पदाधिकारी निवडीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अर्ज दाखल कुठे करायचे?, त्यांच्या मुलाखती कोण घेणार?, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. तरीही शिवसेनेतील विधानसभेची उमेदवारी आता थेट सेना भवनातूनच निश्चित केली जात आहे. ज्या नेत्यांना पक्षात प्रवेश घ्यायचा आहे व ज्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा राजकीय नेत्यांनी थेट उध्दव ठाकरेंची भेट घेणे पसंत केले आहे. आजवर जिल्ह्यातील अशा अनेक नेत्यांनी पक्षप्रवेशाचे निर्णय सेना भवनावरच घेतले. त्यामुळे अर्ज, मुलाखती अशा भानगडीच त्यांनी ठेवल्या नाहीत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआयला अद्याप किती व कोणत्या जागा मिळणार, याची खात्री नाही. त्यामुळे स्वाभिमानीकडून निवडणूक लढवू पाहणाऱ्यांची संभ्रमावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपने सर्वच जागांसाठी अर्ज मागविले होते. भाजप व सेनेने जिल्ह्यातील पाच जागांवर दावा केल्याने अंतिम जागावाटपानंतर नाराजीत आणखी भर पडणार आहे.