दोन्ही काँग्रेसमध्ये ‘जत’साठी स्पर्धा
By Admin | Updated: July 21, 2014 23:49 IST2014-07-21T23:49:18+5:302014-07-21T23:49:18+5:30
विधानसभा निवडणूक : राजकीय वातावरण तापले

दोन्ही काँग्रेसमध्ये ‘जत’साठी स्पर्धा
जयवंत आदाटे ल्ल जत
जत विधानसभा मतदारसंघावर काँग्रेससह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू असली, तरी राष्ट्रवादीत मात्र अद्याप स्पर्धा सुरू झालेली नाही; परंतु तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विलासराव जगताप यांना सहकार्य केले नाही. हा मतदारसंघ सतत ३८ वर्ष काँग्रेसकडे राहिल्याने काँग्रेसला उमेदवारी मिळावी, अशी मागणी माजी आमदार उमाजी सनमडीकर, तालुकाध्यक्ष पी. एस. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे व प्रकाश जमदाडे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.
पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. नऊपैकी सहा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसने मदत केली, तर येथून निश्चित विजय मिळणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. बी. ए. धोडमणी यांनी केला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चारवेळा तालुक्याचा दौरा करून विधानसभा निवडणुकीच्या कामाला तुम्ही लागा, उमेदवारीचे नंतर बघू, असा आदेश दिला आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. प्रभाकर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. चन्नाप्पा होर्तीकर यांची नावे चर्चेत आहेत.
दुसरीकडे आ. प्रकाश शेंडगे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. जत विधानसभा मतदारसंघाचा मी विद्यमान आमदार असून, आपल्याला डावलून पक्ष इतरांना किंवा पक्षात येऊ पाहणाऱ्यांना उमेदवारी देणार नाही. मागील सलग दहा वर्षे येथून भाजप उमेदवार विजयी झाला आहे, असे ते सांगतात.
जतचे नेते विलासराव जगताप यांनी जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या सुरुवातीस भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या ‘मॅजिक पॉवर’मुळे ते जिकडे जातात, तिकडे त्यांचे कार्यकर्ते जातात, याचा प्रत्यय नेहमी आला आहे. जनमताचा अंदाज घेऊन त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. भाजपची उमेदवारी मलाच मिळेल, असा दावा त्यांनीही केला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रणनीती ठरविण्यास त्यांनी २० जुलैपासून सुरुवात केली आहे.