कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:42+5:302021-05-01T04:25:42+5:30
सांगली : कोरोनाची दुसरी लाट प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या वर्षी करू नयेत, अशी मागणी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या रद्द करा
सांगली : कोरोनाची दुसरी लाट प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या वर्षी करू नयेत, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
ते पुढे म्हणाले की, वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे शिक्षक तणावाखाली आहेत. बदलीची टांगती तलवार सतत माथ्यावर लटकवलेली असल्यामुळे शिक्षकांची मानसिकता बिघडत आहे. त्याचा आधी शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर, पर्यायाने विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे या बदली धोरणाचाच साकल्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि शिक्षकाचे हित पाहिजे असेल तर शिक्षकांच्या बदल्या विनंतीशिवाय केल्या जाऊ नयेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया तातडीने थांबविण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
चौकट
बदली धोरणात सुचविलेले बदल
-विनंती बदलीशिवाय इतर कोणत्याही ऑनलाइन, ऑफलाइन प्रशासकीय बदल्या करू नयेत.
-विद्यार्थ्यांना त्यांची स्थानिक भाषा अवगत असलेले शिक्षक मिळण्याचा अधिकार शाबूत ठेवावा
-रँडम राऊड व विस्थापित शिक्षक, दुर्गम भागातील शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. त्यांना त्यांच्या विनंतीनुसार बदली द्यावी.
-पती, पत्नी एकत्रीकरणानुसार विनंती बदल्या कराव्यात.
-महिला शिक्षकांची विनंती प्राधान्याने मान्य करावी.
चौकट
जिल्हांतर्गत बदल्यांमधील खो पद्धत बंद करा : कृष्णा पोळ
जिल्हा परिषद शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या कराव्यात. विनंती बदली रिक्त जागेवर करावी. नवीन सुधारित धोरणात बदलीतील खो पद्धत तशीच ठेवली आहे. खो पद्धतीमुळे एकाच वेळी जास्त प्रमाणात बदल्या होऊन पूर्ण शैक्षणिक घडी विस्कटून जाते. म्हणूनच बदल्यांमधील खो पद्धत बंद करून विनंती बदल्या सेवाज्येष्ठतेने कराव्यात, अशी मागणी कृष्णा पोळ यांनी केली.