दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजपची होणार गट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:36+5:302021-02-16T04:28:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू असल्या तरी यंदा राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे ...

दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजपची होणार गट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू असल्या तरी यंदा राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी शेतकरी पॅनेलमध्ये सर्वच पक्षाचे संचालक असले तरी गतवेळी विरोधात गेलेल्या कदम गटाला सोबत घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांकडून सुरू आहे. काँग्रेसमधील विशाल पाटील यांचा गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली जिल्हा बँकेत गत निवडणुकीत शेतकरी विरुद्ध रयत पॅनेल अशी लढत झाली होती. विशाल पाटील व कदम गटाने पुढाकार घेऊन काँग्रेस नेत्यांचे पॅनेल उभे केले होते. या रयत पॅनेलमधील कदम गटाला सोबत घेण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असले तरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटामार्फत विशाल पाटील गटाशीही चर्चा होण्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांच्या भूमिकेवर निवडणूक बिनविरोधचे गणित अवलंबून राहणार आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. प्राथमिक स्तरावर त्यांनी याबाबतची चर्चा काही संचालकांशी केली आहे. जयंत पाटील यांचे बँकेवर वर्चस्व आहे. विरोधी रयतच्या मागील निवडणुकीत सहा जागा आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या या पॅनेलची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनाही यंदा सोबत घेऊन जयंत पाटील जिल्हा बँकेत सर्वसमावेशक संचालक मंडळ देण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत ठोस कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
भाजपकडून स्वतंत्रपणे पॅनेल होण्याची शक्यता कमी आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, संग्रामसिंह देशमुख, शिवसेनेचे आ. अनिल बाबर हे सध्या सत्ताधाऱ्यांमार्फत संचालक मंडळात आहेत. भाजपच्या संचालकांचा कल नेहमीप्रमाणे आहे त्या पॅनेलसोबत जाण्याकडे असण्याची चिन्हे दिसत आहेत.
दादा गटाकडे लक्ष
वसंतदादा गटाचे नेतृत्व करणारे विशाल पाटील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार यावर बिनविरोध निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. दादा गटाचे काही मतदारसंघात वर्चस्व असल्याने त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.