महापालिकेत गाडगीळांना डावलून भाजपचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:18+5:302020-12-11T04:53:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळलेल्या सांगलीकरांनी आमदार सुधीर गाडगीळांच्या स्वच्छ प्रतिमेकडे पाहून भाजपला महापालिकेची सत्ता दिली. राज्यातील ...

महापालिकेत गाडगीळांना डावलून भाजपचा कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळलेल्या सांगलीकरांनी आमदार सुधीर गाडगीळांच्या स्वच्छ प्रतिमेकडे पाहून भाजपला महापालिकेची सत्ता दिली. राज्यातील भाजपच्या सत्तेमुळे शहरात सुधारणा होईल, असाही भाबडेपणा त्यामागे होता. मात्र आता खुद्द आ. गाडगीळांनाच डावलून भाजपचा कारभार चालल्याचे चित्र आहे. सत्तेची सूत्रे भलत्यांच्याच हातात गेल्याने भाजपच्या ललाटीही बदनामीचा कलंक लागला आहे.
आ. गाडगीळ यांना सांगलीकरांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत पाठवले. त्यावेळची त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि उपद्रवमूल्य नसलेला नेता अशी ओळख आताही कायम आहे. पण भाजपमधील लाथाळ्या आणि महापालिकेतील तथाकथित कारभाऱ्यांचा फटका गाडगीळांना २०१९ मधील दुसऱ्या निवडणुकीत बसला. त्यांचे मताधिक्य केवळ पाच-सहा हजारावर आले.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीवेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्याबळावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्ष फोडून भाजपमध्ये महाभरती केली. सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांमध्ये भाजपचे बाहूबळ वाढले. त्यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष असणाऱ्या गाडगीळांनी रसद पुरवल्याने महापालिकेत सांगली-कुपवाडमधून भाजपला लक्षणीय यश मिळाले. तिन्ही शहरांची गोळाबेरीज करून काठावरच्या बहुमताने भाजप सत्तेत आली. चंद्रकांत पाटील यांनी आ. गाडगीळ महापालिकेची सूत्रे सांभाळतील, असे जाहीर केले. पण प्रत्यक्षात सूत्रे भलत्याच हातात दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादीतून विशेषत: २००८ मध्ये सत्तेवर आलेल्या महाआघाडीतून आयात केलेल्यांचे कारनामे लगेच सुरू झाले. त्यात भाजपमधील जुनी मंडळीही होती. टक्केवारीचा वास येणारे वादग्रस्त निर्णय सर्रास घेतले जाऊ लागले. नेत्यांना डावलून कारभार हाकला जाऊ लागला. भाजपही आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या वळणावर जाऊ लागल्याने तक्रारी वाढल्या. आ. गाडगीळांनी महापालिकेत जाऊन लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, पण कारभाऱ्यांनी त्यांच्याही हातावर तुरी दिल्या. चंद्रकांत पाटील यांच्या ‘बॅकिंग’वर कारभारी प्रतिआमदार बनले. मग गाडगीळांनीही हात जोडले! सध्या महापालिकेच्या कोणत्याही निर्णयात गाडगीळांना विचारात घेतले जात नाही आणि गाडगीळही ‘नको रे बाबा, ती महापालिका’ म्हणत चार हात दूर आहेत.
--------------
इनाम वतन मिळाल्याचा थाट!
महापालिका म्हणजे जणू ‘इनाम वतन’ मिळाल्याच्या थाटात आता भाजपचे कारभारी वावरत आहेत. ‘किंगमेकर’ म्हणवून घेणाऱ्या काहींची दुकानदारी चालल्याची कुजबूज भाजपमधून ऐकायला मिळते. तिकडे मिरजकरांनी तर ‘मिरज पॅटर्न’चा इंगा भाजपला कधीच दाखवला आहे. ‘आम्ही पक्षासाठी नाही, तर पक्ष आमच्यासाठी’ असा तोरा मिरवत मिरजकर सांगली-कुपवाडकरांशी फटकून असतात.