भाजपचे नाराज २२, गळाला लागले ९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:01+5:302021-02-23T04:40:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर आता नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली ...

BJP's 22 angry, 9 choked | भाजपचे नाराज २२, गळाला लागले ९

भाजपचे नाराज २२, गळाला लागले ९

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच आलेल्या भाजपच्या अडीच वर्षांच्या कारभारावर आता नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या ४३ नगरसेवकांपैकी जवळपास निम्मे म्हणजे २२ नगरसेवक नाराज आहेत. महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले. महापालिकेच्या बदनामीचे शिंतोंडे अंगावर नको, अशी बोटचेपी भूमिका घेतल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे.

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. पण, अडीच वर्षांत पारदर्शी कारभाराच्या नावावर कशीबशी सत्ता टिकली. सुरुवातीला थोड्याफार कुरबुऱ्या होत्या. पण, महापौरपद खुले होताच या कुरबुऱ्यांना असंतोषाचे स्वरूप प्राप्त झाले. पण, भाजपचे दोन्ही आमदार, महापालिका कारभाऱ्यांनी या असंतोषाकडे कानाडोळा केला. करिष्म्यावर भरवसा ठेवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही आगामी महापौर, उपमहापौर निवडी निर्oिघ््u पार पडतील, असे वाटत होते. पण इथेच त्यांची फसगत झाली.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रमात माहीर. भाजपमधील असंतोष त्यांच्या नजरेत आला नसेल तर नवलच. सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने भाजपला सुरुंग लावण्याचे नियोजन सुरू केले. तब्बल २२ नगरसेवक भाजपवर नाराज असल्याचेही दिसून आले. या नगरसेवकांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क वाढविला. त्यांच्या राजकीय भवितव्याची हमीही घेतली. त्यातून सध्याचा महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ रंगला आहे.

राष्ट्रवादीने १२ नगरसेवकांशी अर्थपूर्ण बोलणी केली. अडीच वर्षांच्या सत्तेत लक्ष्मीदर्शनपासून लांब असलेल्या या नगरसेवकांनीही भाजपला चकवा दिला. त्यातील तीन जणांना शहराबाहेर हलविण्याचा डाव फसला. पण नऊ जण मात्र अज्ञातस्थळी रवाना झाले. आता त्यातील दोघेजण परतले आहे. त्यातील एकाला केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर परतावे लागले. तर, एकाला घरगुती अडचणीमुळे माघारी यावे लागले. पण, ते परत आले असले तरी भविष्यात मनाने भाजपसोबत कितपत राहतील, हा प्रश्न आहेच. भाजपमधील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कारभारापासून स्वत: नेहमीच दूर ठेवले आहे. त्यामागे त्यांचे स्वत:चे राजकारण आहे. पण, याच नेत्यांमुळे जनतेने महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती सोपविल्याचा विसर पडला आहे. स्वत:ची बदनामी नको, या भूमिकेतून भाजपचे नेते महापालिकेचा गाडा हाकत आहेत. त्यातून नगरसेवकांच्या इच्छा, आकांक्षा बेदखल झाल्यानेच भाजपवर आजची वेळ आली आहे.

चौकट

सत्तेचा सोपान मदनभाऊंनाच लखलाभ

महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत तीनवेळा मदन पाटील यांची सत्ता होती. तर, एकदा विकास महाआघाडी तर आता भाजपची सत्ता आहे. मदनभाऊंच्या सत्ताकाळातही नगरसेवकांत पदासाठी चढाओढ होत असे. अर्ज भरेपर्यंत त्यांच्या गटातील नगरसेवकांतही नाराजी, रुसवेफुगवे होत. पण, शेवटी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांचा कालखंड पूर्ण होत असे. महाआघाडीच्या काळात अडीच वर्षानंतर सत्तेला सुरुंग लावला होता. आताही भाजपची वाटचाल त्याच मार्गावर आहे. त्यातून सत्ता टिकविण्यात भाजपला कितपत यश येते, हे मंगळवारी स्पष्ट होईल.

Web Title: BJP's 22 angry, 9 choked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.