सांगली : कृष्णा नदीचे वाढते प्रदूषण, शेरीनाल्याचे दूषित पाणी, सांगली ड्रेनेज योजनेतील अपूर्ण कामे यावरून महासभेत संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जनतेला शुद्ध पाणी देऊ शकत नाही, हा महापालिकेचा नाकर्तेपणा आहे. त्यांना विकतचे विष द्यायचे का? असा सवाल करीत प्रशासनावर हल्लाबोल केला.महापालिकेची सभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत स्वाती शिंदे यांनी दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या आठवड्यात तीन वेळा कृष्णा नदीत मासे मृत झाले. प्रदूषण मंडळ केवळ नोटिसा पाठवते. अनेक कारखान्यांचे रासायनयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. महापालिकेने यावर कुणावर कारवाई केली, त्याचा अहवाल जनतेसमोर आला पाहिजे, अशी मागणी केली. सार्वजनिक शौचालयाचे मलयुक्त पाणी नदीपात्रात जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केला.बिल्कीस बुजरूक यांनी मिरजेतील पाणीपुरवठा कार्यालयाची कंपाउंड भिंत नसल्याने तिथे नशेखोरांचा अड्डा झाला आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. नुकतीच एक मृत व्यक्तीही आढळून आल्याचे निदर्शनास आणून दिले. दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा लाइनमधूनच गॅसच्या लाइन गेल्या आहेत. अनेक ठिकाणी गळती होत आहे. मंगलमूर्ती कॉलनीत ५३ दिवसांपासून पाणी नाही. दत्तनगरमधील टाकीचे काम अजून सुरू झाले नसल्याचे सांगितले.नसिमा नाईक यांनी सणासुदीचे दिवस आहेत. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. युवराज बावडेकर यांनी मी घरातून पाण्याची बाटली घेऊन आलोय, असे सांगत शेरीनाल्याचा प्रश्न वारसा हक्काने सुरू आहे. केवळ मोर्चे काढले जात आहेत. महापालिका जादा पाणी उचलत असतानाही नागरिकांना पाणी मिळत नाही. मग पाणी कुठे मुरते? असा सवाल केला.
यावर आयुक्त सत्यम गांधी यांनी पाणी प्रश्न गंभीर झाल्याचा कबुली दिली. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी वारणा उद्भव योजनेचा आराखडा तयार करून जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. ही मान्यता आल्यानंतर प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू. सध्या महापालिका ८० एमएलडी पाणी उचलत आहे. जादा पाणी उचलूनही झोनिंग नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.माळ बंगला येथे नवीन ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण केले जाणार आहे. याशिवाय माळ बंगला व जॅकवेलच्या ठिकाणी दोन नवीन पंप बसवण्यात येणार आहेत. गावभाग, खणभाग परिसरात झोनिंगसाठी २८ कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. शेरीनाल्यावर नवीन पंप बसवले आहेत. शेरीनाला प्रकल्पही शासनाकडे पाठविल्याचे निदर्शनास आणून दिले.सभेत सांगली ड्रेनेज योजनेवर चर्चा झाली. लक्ष्मण नवलाई यांनी तेरा वर्षे ही योजना रखडली आहे. शहरात नवनवीन अपार्टमेंट होत आहेत. शोषखड्डे भरून दुर्गंधी वाढली आहे. एक महिन्यात योजना पूर्ण न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला. अभिजीत भोसले म्हणाले की, सांगली ड्रेनेज योजनेवर विधिमंडळात चर्चा झाली. पण, आजही योजनेची प्रगती नाही. हायकोर्टात तर योजना पूर्ण झाल्याचे शपथपत्र घेतले आहे. ही न्यायालयाची दिशाभूल आहे.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे म्हणाले की, ड्रेनेज ठेकेदाराला ३ एप्रिल २०१३ला वर्कऑर्डर दिली. आत्तापर्यंत त्याला सात वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अंकली व पद्माळे पंप हाऊसची जागा, महापूर, कोरोना आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे या योजनेला विलंब झाला. आत्तापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित पाच टक्के कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे.यावर महापौर सूर्यवंशी यांनी योजनेत अजून अनेक त्रुटी आहेत. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात विशेष सभा घेऊन योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिली.
Web Summary : Sangli residents are angry about polluted water issues. Councilors grilled officials about Krishna river pollution, drainage work delays. They questioned if citizens are being forced to drink poison due to the municipality's failure to provide clean water. Officials acknowledged the problem and outlined plans for improvements.
Web Summary : सांगली के निवासी दूषित पानी की समस्या से नाराज हैं। पार्षदों ने कृष्णा नदी के प्रदूषण और जल निकासी कार्य में देरी को लेकर अधिकारियों से सवाल किए। उन्होंने पूछा कि क्या नागरिकों को साफ पानी मुहैया कराने में नगरपालिका की विफलता के कारण जहर पीने के लिए मजबूर किया जा रहा है। अधिकारियों ने समस्या स्वीकार की और सुधार की योजना बताई।