जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेवर ४० सदस्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:15+5:302021-06-19T04:19:15+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गैरकारभार झाकण्यासाठीच दि. २१ रोजीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा हट्ट धरल्याचा ...

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेवर ४० सदस्यांचा बहिष्कार
सांगली : जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गैरकारभार झाकण्यासाठीच दि. २१ रोजीची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा हट्ट धरल्याचा आरोप करून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ४० सदस्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. सभागृहात ठिय्या मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सोलापूर, सातारा जिल्हा परिषदेच्या सभा ऑफलाईन होत असतील तर सांगलीत अडचण काय, असा सवाल या सदस्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. कोरोनाचे कारण देत अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी सर्व सदस्यांशी तसा पत्रव्यवहारही केला आहे. कोरे यांच्या ऑनलाईन सभेच्या भूमिकेला भाजपच्या सदस्यांनीच तीव्र शब्दात विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे संभाजी कचरे, अर्जुन पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, महादेव पाटील, भाजपचे अरुण राजमाने, अरुण बालटे, नितीन नवले, सरदार पाटील आदी ४० सदस्यांची ऑनलाईन बैठक शुक्रवारी झाली.
पदाधिकारी आणि काही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने केलेला गैरकारभार झाकण्यासाठीच ते ऑनलाईन सभा घेत आहेत. सातारा, सोलापूर जिल्हा परिषद, महापालिका सभा ऑफलाईन होत आहेत. तेथील कोरोना रुग्णांची संख्या सांगली जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. सांगलीची रुग्णसंख्या कमी असतानाही ऑफलाईन सभा का घेतली जात नाही. सदस्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न चालू देणार नाही, असा इशारा अर्जुन पाटील, संभाजी कचरे यांनी दिला.
सर्वसाधारण सभा ऑफलाईनच झाली पाहिजे. अन्यथा सर्वपक्षीय ४० सदस्य ऑनलाईन सभेवर बहिष्कार घालतील. बहिष्कार घालून सर्व सदस्य सोमवार, दि. २१ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहात ठिय्या मारतील, असेही पाटील, कचरे यांनी स्पष्ट केले.
चौकट
साहित्य, औषधे खरेदीत लाखोंचा घोटाळा
जिल्हा परिषदेत साहित्य, औषध खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष चालू झाले तरीही पुस्तके मिळाली नाहीत. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. या सर्व प्रकरणांवर सदस्यांनी काही बोलू नये, यासाठीच ऑनलाईन सभा घेण्याचा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सदस्यांनी केला.