द्राक्ष निर्यातीत १३१८ टनांची घट
By Admin | Updated: April 13, 2015 00:05 IST2015-04-12T22:31:41+5:302015-04-13T00:05:06+5:30
अवकाळीचा पंचवीस कोटींचा फटका : व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक

द्राक्ष निर्यातीत १३१८ टनांची घट
सांगली : ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यामुळे आणि पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षबागांचे क्षेत्र वाढले होते. हे क्षेत्र गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक असल्यामुळे २०१४-१५ वर्षात द्राक्षांची निर्यातही जादा होणार, असा अंदाज होता. परंतु, फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्यात द्राक्षबागांतील मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीच बंद केली. यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र जादा असूनही १३१८ टनाने द्राक्षांची निर्यात कमी झाल्यामुळे बागायतदारांना वीस ते पंचवीस कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ४१ हजार २०० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र असून यामध्ये निर्यातक्षम द्राक्षांचे एक हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. युरोपीय राष्ट्रांत जिल्ह्यातील द्राक्षाला चांगली मागणी आहे. शिवाय, तेथे दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीकडे वळला होता. शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होत होता. जिल्ह्यात २०१०-११ मध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे ९४८ शेतकऱ्यांनी ४००.३४ हेक्टर क्षेत्रावरील सहा हजार २५२ टन द्राक्षांची निर्यात केली होती. त्यानंतर २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षापर्यंत जिल्ह्यातून सरासरी साडेचार हजार टन द्राक्षे निर्यात झाली होती. शंभर ते दीडशे कोटींचे परकीय चलन जिल्ह्याला मिळत होते. २०१४-१५ या वर्षात निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रशासनाकडे ९३७ शेतकऱ्यांनी ४४६.३५ हेक्टरची नोंदणी केली होती. सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होईल, असाच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज होता. पण, फेबु्रवारी आणि मार्च २०१५ मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. द्राक्षबागेतील काही मण्यांना तडे गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष खरेदीच थांबविली. निर्यातदार व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार द्राक्षबागेतील एखाद्या घडामधील मण्याला तडा गेला असेल, तर पूर्ण बॉक्समधील द्राक्षांना भुरी लागण्याची शक्यता असते. कारण, युरोपीय राष्ट्रांपर्यंत द्राक्षे पोहोचण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधित पूर्ण कंटेनरमधील द्राक्षांना भुरी लागून ती खराब होण्याची शक्यता असते. यामुळेच द्राक्ष खरेदी थांबविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) द्राक्ष निर्यात जादा होणार अशी अपेक्षा होती. परंतु, अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे ३७४१ टन द्राक्षांचीच निर्यात झाली आहे. आता जत, खानापूर तालुक्यातून काही प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे. -डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा वर्षक्षेत्र (हेक्टर) शेतकरी संख्या टनकंटेनर २०१०-११४००़३४९४८६२५२५०२ २०११-१२४३८़२३९८४४६३८३८० २०१२-१३३३०़७५७४७४१६८३२८ २०१३-१४३९८.७६८४४५०५९३९६ २०१४-१५४४६.३५९३७३७४१२९६