मुलांच्या मनातला भावनांचा कल्लोळ शांत कसा कराल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:41 IST2017-09-06T15:40:07+5:302017-09-06T15:41:07+5:30
मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी या काही क्लृप्त्या..

मुलांच्या मनातला भावनांचा कल्लोळ शांत कसा कराल?
- मयूर पठाडे
लहान लहान मुलं.. अगदी शाळकरी, पण तरीही त्यांच्याही मनात भावनांचा कायमच कल्लोळ असतो. आजकालच्या फास्ट आणि अभासी जगात तर भावनांचा हा गुंता अधिकच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
आपल्याला वाटतं, मुलं लहान आहेत, त्यांना कसलं आलंय टेन्शन आणि चिंता, पण खरं तर या वयातलं टेन्शन आणि त्यांच्या भावनांचा निचरा योग्य वेळीच केला गेला नाही, तर पुढे आयुष्यभर या गोष्टी त्यांना त्रास देतात आणि याच ठिसूळ पायावर त्यांची भविष्याची इमारत उभी राहते, त्यामुळे मुलांच्या इमोशनल इंटेलिजन्सकडे अधिक गांभीर्यानं पाहाण्याची गरज आहे.
मुलांचा इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवायचा, हे आपण गेल्या भागात पाहिलं, या भागात त्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी..
१- आजकाल कोणतीही मुलं पाहा, ती पटकन चिडतात, लगेच इमोशनल होतात, काही आपल्याशीच कुढतात, तर काही आदळआपट करतात.. त्यांच्यातल्या वागणुकीचाच बदल पालकांना लक्षात येतोच, पण त्यावर आपणही काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा कल्लोळ शांत कसा करता येईल याकडे आधी लक्ष द्यायला हवं. डिप ब्रिदिंग, एक ते शंभर आकडे मोजणं, त्या वातावरणातून थोडा वेळ त्यांना बाहेर नेणं.. यासारख्या गोष्टींनी आपल्या भावनांवर कंट्रोल करणं त्यांना शिकवता येईल.
२- फ्रस्ट्रेशन, नैराश्य प्रत्येकालाच येतं, पण त्यावरची प्रतिक्रिया नकारात्मकच असली पाहिजे असं नाही. हे नैराश्य पॉझिटिव्हली कसं हाताळायचं हे मुलांना कळलं पाहिजे.
३- प्रश्नांच्या भोवºयात गिरक्या मारत राहण्यापेक्षा हे प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील, त्यातून कसं बाहेर पडता येईल हे मुलांना कळलं तर ते आव्हानांशी लढायलाही शिकतील.
४- प्रत्येक टप्प्यावर आपला आपल्याशी संवादही महत्त्वाचा असतो. स्वसंवादाशिवाय आपल्यातल्या कमतरता आणि आपल्या जमेच्या बाजू याविषयी नीटशी कल्पना येत नाही. या स्वसंवादासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं.
५- भावभावनांचा सामना करताना काही क्लृप्त्याही वापरता येतील. प्रत्येक वेळी आपणच जिंूक किंवा हरू असं होत नाही. ‘विन-विन’ सिच्युएशन मात्र प्रत्येक वेळी आणता येते. ही परिस्थिती कशी आणता येईल याचं भान मुलांना आलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या भावना हाताळू शकतील.