मार्ग दिसायला इच्छा हवी...!--
By Admin | Updated: August 22, 2014 22:47 IST2014-08-22T22:46:46+5:302014-08-22T22:47:51+5:30
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इच्छा...! पर्यावरणाला धक्का न लावता प्रत्येकाला काम देण्याची...!

मार्ग दिसायला इच्छा हवी...!--
मनोज मुळ्ये----इ च्छा असेल तर मार्ग दिसेल, हे वाक्य लहानपणी खूप वेळा कानावरून गेलं आहे. आजोळी मातीच्या घराच्या वाशांवर लिहिलेली यासारखी अनेक वाक्य आजही तितकीच स्पष्ट आहेत. काळाच्या ओघात वासे जाऊन सिमेंटचे स्लॅब आले. पण ती वाक्य मनावरून पुसली गेली नाहीत. आताच्या काळात तर पावलोपावली आठवत राहतात. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, ही गोष्ट आता खूप जुनी वाटायला लागली आहे. कारण आजकाल जो तो इच्छा न ठेवताच मार्ग दिसावा, अशी अपेक्षा करतो. इको सेन्सिटिव्ह झोनबाबत सध्या तीच स्थिती आहे. पर्यावरण कायम ठेवून विकास करण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आपल्याला त्याबाबतचे मार्गच दिसत नाहीत.
विकास हा शब्द राजकीय लोकांनी अतिशय बोथट करून टाकला आहे. आता हा शब्द म्हणजे विनोदच वाटतो. कारण विकास या शब्दाला कसली व्याख्याच केली जात नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर विकासाची व्याख्या माणसागणिक बदलत जाते. पूर्वी चालत फिरणारा माणूस मग दुचाकीने फिरायला लागला आणि आता चारचाकी गाडीने फिरतो, याला काही लोक विकास म्हणतात. सुधारणा असा त्यातून ढोबळ अर्थ काढता येईल. पण, ही सुधारणा होण्यासाठी आपण काहीतरी गमावतोय, हेही तेवढंच खरं आहे. मग त्या सुधारणेला विकास म्हणायचं का? दुचाकी आली, चारचाकी आली, जगणं थोडं सोपं झालं. पण त्यामुळे प्रदूषणही आलं. दुचाकी वापरणारा माणूस चारचाकी घेण्यासाठी कामाचा ताण वाढवून घेतो, त्यातून दुचाकीचा आनंद मिळवायचे क्षण राहूनच जातात.
पूर्वी कच्च्या रस्त्यांवरुन लोक बैलगाडीने किंवा चालत प्रवास करायचे. आता रस्ते डांबरी झाल्यामुळे लोक बसने, स्वत:च्या गाडीने प्रवास करतात. हीदेखील सुधारणा आहे. त्याला विकास म्हणायचे का? गावात डांबरी रस्ता गेला म्हणून गावातल्या लोकांना गावातच रोजगार मिळतो का? त्यासाठी त्यांना मोठ्या शहराकडेच जावे लागते. साहजिकच मोठ्या शहरांमधल्या समस्या वाढतात.
प्रत्येक माणसाला त्याच्या गरजा भागतील, इतके अर्थार्र्जन त्याच्या गावातच करता येतंय का? ते जर करता आलं तर त्याला विकास म्हणता येईल का? आता गावातल्या गावात अर्थार्जन करण्यासाठी पर्याय काय, असा प्रश्न साहजिकच पुढे येईल. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. गावातल्या प्रत्येकाला काम मिळण्यासाठी केवळ मोठमोठे उद्योग किंवा कारखानेच येण्याची गरज नाहीये. केवळ कारखान्यात नोकरी मिळाली म्हणजे माणसं सुखी समाधानी होतील, असं म्हणणं धाडसाचं ठरेल आणि हे कारखाने काढून शेवटी निसर्गाचा ऱ्हास होतो, म्हणून त्यावरही टाच आणण्याचा विचार आज जागतिक स्तरावर सुरू आहेच. त्यामुळे कारखाने हा प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठीचा फार यशस्वी पर्याय ठरणार नाही. पण निसर्ग शाबूत ठेवून त्या निसर्गावरच आधारित उद्योग आपल्याला प्रत्येक गावागावात सुरू करता येणं शक्य आहे का? विचार केला तर त्यात अशक्य असे काहीच नाही. पण अर्थात या दृष्टीने विचार करायची इच्छा हवी.
खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना समुद्र आणि सह्याद्री अशी दोन वरदाने मिळाली आहेत. या दोन्हीच्या आधारे पर्यटन आणि शेती हे दोन्ही व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतात. पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी फक्त पंचतारांकित हॉटेल्सचीच गरज नाही. मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे जवळजवळ प्रत्येक घरात पर्यटक निवासाची सुविधा आहे. शहरीकरणाला कंटाळलेले लोक ग्रामीण वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी येतात आणि त्यांना अशी घरगुती व्यवस्थाच अधिक पसंत पडते. सुरक्षित समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचा व्यवसाय जोमाने उभा राहू शकतो.
भरघोस उत्पन्न देणाऱ्या फळझाडांची लागवड हा तर दुहेरी यशाचा मार्ग. एकतर येथे फळांचे उत्पन्न मिळतेच. शिवाय कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनही खूप मोठा आधार उभा राहतो. रत्नागिरी जिल्ह्यात आता कृषी पर्यटनालाही वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातून पर्यावरणाची जपणूक होते आणि उत्पन्नही मिळते. खास ग्रामीण भाग म्हणून राहण्यासाठी आलेले लोक स्थानिक फळांपासून बनवलेले पदार्थही मोठ्या प्रमाणात खरेदी करून नेतात. त्यातून फळप्रक्रिया उद्योगांना हातभार लागू शकतो. हे व्यवसाय एकमेकांवर आधारित असेच आहेत.
कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. पण शहरीकरणाच्या दिखाव्याची ओढ असलेली माणसे समजायला लागताच शहरांकडे धावतात आणि ग्रामीण भागात कृषी पर्यटनाचा व्यवसाय चालवण्यासाठी नेपाळी कामगार आणावे लागतात.
उत्पन्नाचा आणखी एक मोठा मार्ग म्हणजे विविध प्रकारची शेती. कोकणातील माती लागवडीला पोषक असतानाही भाजीपाला आणि कडधान्यांच्या पिकाकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे, अशा भागात तरी भाजीपाला, कडधान्याची लागवड व्हायला हवी. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात. त्याचे महत्त्व परदेशातल्या लोकांना किंवा या वनस्पतींच्याआधारे लाखो रूपये कमावणाऱ्या औषध कंपन्यांना समजले आहे. पण स्थानिक माणसांना त्याचे महत्त्व कळलेले नाही. हिरडा, बिब्बा, तिरफळ यासारखी फार मोठा खप असलेली लागवड कोकणात खूप कमी होते. नारळी, सुपारीच्या बागांमध्ये मसाला पिके घेण्याची संधी असतानाही त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यापेक्षा बाहेरून येणारे मसाले चढ्यादराने खरेदी केले जातात. व्यवसायाच्या या संधी अजून दुर्लक्षितच आहेत.
भातपीक व्यवहार्य होत नाही, अशी सबब देत आपण कुठल्याच पिकाकडे लक्ष देत नाही. हे सगळे व्यवसाय याआधी कोणी केलेच नाहीत, असा भाग नाही. हे सगळे व्यवसाय करायला घेतले की धो-धो पैशाचा ओघ सुरू होईल, असाही भाग नाही. त्यातही समस्या आहेत. पण त्या समस्या सुटण्यासारख्या आहेत. त्यातून पैसा कमवायची इच्छा असेल तर आपल्याला शेकडो मार्ग दिसतील. पण महत्त्वाचे आहे ते इच्छा असण्याचे.
सर्वात प्रबळ असावी लागते ती राजकीय इच्छाशक्ती. पण लोकांचे भले करण्यापेक्षा स्वहीत जोपासणाऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कसे वाटेल? कोकणातील तळागाळातील सामान्य माणसाला समृद्ध करायचं असेल, त्याच्या हाताला काम द्यायचे असेल तर त्यासाठी त्याला पर्यावरणपूरक उद्योग करण्यासाठी अर्थसाह्य द्यावे लागेल. त्याला उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थेत मार्गदर्शन करावे लागेल. पण तसे करण्यात आपला वेळ फुकट घालवण्यापेक्षा शे-पाचशे कोटींचा प्रकल्प आणणाऱ्या माणसाला जागा उपलब्ध करून दिली की, आपलं बरंचसं भागून जातं, हा विचार करणाऱ्या राजकीय लोकांच्या मनात पर्यावरणपूरकतेचे बीज रोवायला हवंय. आंबा हे कोकणचे एक उत्पन्न झालं. त्याखेरीजही अनेक फळ उत्पादने कोकणच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतात. मार्ग खूप दिसतील. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इच्छा...! पर्यावरणाला धक्का न लावता प्रत्येकाला काम देण्याची...!