वीकेण्ड लाॅकडाऊनमुळे बससेवेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:33+5:302021-04-11T04:31:33+5:30
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कडक निर्बंध जाहीर करतानाच शनिवार, रविवार वीकेण्ड लाॅकडाऊन घोषित केले. त्यामुळे लोक ...
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने कडक निर्बंध जाहीर करतानाच शनिवार, रविवार वीकेण्ड लाॅकडाऊन घोषित केले. त्यामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा चांगलाच परिणाम एसटी वाहतुकीवर झाला आहे. शनिवारी दिवसभरात अवघी १० टक्केच एसटीची वाहतूक सुरू होती.
गतवर्षी लाॅकडाऊन काळात सलग दोन ते अडीच महिने एसटीची चाके पूर्णत: थांबली होती. शासनाच्या परवानगीनंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू झाली. मात्र याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. हळूहळू एसटी रुळावर येत असतानाच पुन्हा वीकेण्ड लाॅकडाऊनचा फटका बसला आहे. रत्नागिरी विभागात ६०० गाड्यांद्वारे दैनंदिन ४,२०० फेऱ्या सोडण्यात येतात. एक लाख ८० हजार किलोमीटर प्रवासातून एसटीला सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळते. जेमतेम डिझेल खर्च भागत असला तरी स्पेअरपार्टस् व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. वीकेण्ड लाॅकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याने एसटीची सेवा पूर्ववत सुरू होती. मात्र प्रवासीच नसल्यामुळे एसटीच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. दिवसभरात अवघ्या १६० फेऱ्या संपूर्ण विभागातून सोडण्यात आल्या. १९ हजार ५०१ किलोमीटर इतकाच प्रवास झाल्याने जेमतेम पाच लाखांचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे. अवघ्या दहा टक्के उत्पन्नामुळे एसटीची आर्थिक गणिते पुन्हा विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
.....................
शासनाच्या सूचनेनुसार एसटी सेवा सुरू ठेवण्यात आली होती. दिवसभरात प्रवासी संख्या कमी लाभल्याने १६० फेऱ्या सोडण्यात आल्या. प्रवासी भारमान कमी असल्याने मोजक्याच फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. रविवारी प्रवासी भारमान लक्षात घेऊनच फेऱ्या साेडण्यात येणार आहेत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी