नौका उलटून तीन भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:49 IST2017-09-12T23:49:41+5:302017-09-12T23:49:41+5:30

Three brothers die after boat sank | नौका उलटून तीन भावांचा मृत्यू

नौका उलटून तीन भावांचा मृत्यू



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेली आयशाबी ही नौका उलटून तीन सख्ख्या भावांसह चारजण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये घडली. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण आणि हसन पठाण या तीन सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले असून, सायंकाळी उशिरापर्यंत तव्वकल अब्दुलसत्तार बांगी याचा शोध लागलेला नाही.
सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दीन लतिफ पठाण हा आयशाबी नावाची मासेमारी नौका (एनडी एमएच ४ एमएम २९८१) घेऊन सोमवारी जेवण आटोपून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी बाहेर पडले. जैनुद्दीन पठाण याच्यासोबत त्याचे दोन सख्खे भाऊ अब्बास, हसन आणि आणखी एक सहकारी तव्वकल अब्दुलसत्तार बांगी हेही नौकेवर होते. रात्री मुसळधार पावसामुळे जैनुद्दीन व त्याचे भाऊ १.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा पूर्णगड जेटीवर येण्यासाठी निघाले होते. खाडीच्या मुखाशी जोरदार लाटेच्या तडाख्याने ही नौका पलटी झाली. त्यामध्ये जैनुद्दीन, अब्बास, हसन आणि तव्वकल बांगी हे चौघेही समुद्रात पडले. नौका समुद्रात बुडत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी खाडीच्या दिशेने धाव घेतली; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
जवळपास दहा तास या चौघांचा शोध पोलीस, कोस्टगार्ड व ग्रामस्थ घेत होते. त्यामध्ये जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण, हसन पठाण या तिघांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तव्वकल बांगी याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

Web Title: Three brothers die after boat sank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.