शेतीपंपाचे हजारो रुपये बिल; शेतकरी हैराण
By Admin | Updated: March 11, 2016 00:02 IST2016-03-10T23:04:56+5:302016-03-11T00:02:21+5:30
अडूरची घटना : मीटर कापल्याने नारळी-पोफळींची बाग सुकली

शेतीपंपाचे हजारो रुपये बिल; शेतकरी हैराण
असगोली : शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनी आपल्या चुका लपवण्यासाठी आणि मार्चपूर्वी वसुली दाखवण्यासाठी शेतकऱ्याचा नाहक बळी देत असल्याचा प्रकार अडूर नागझरीतील प्रकाश मांडवकर यांच्या बाबतीत घडला आहे.
मांडवकर यांनी एप्रिल २००९ साली कागदपत्रांची पूर्तता करून शेती आणि नारळी - पोफळींच्या बागायतीसाठी विद्युत शेतीपंप कनेक्शन घेतले होते. ३ एचपीचा त्यांचा शेती पंप आहे. नवीन मीटरचे पैसे भरुनसुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुना मीटर बसवून दिला. त्यानंतर महावितरणने ३० आॅक्टोबर २००९ साली ११० रुपयांचे पहिले बिल दिले होते, तेही कोणतेही युनिट न पाहता. त्यानंतर चार वर्षांनी मार्च २०१३मध्ये ४७० रुपयांचे बिल दिले, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये ६०० रुपयांचे बिल दिले होते, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते.
ही सर्व बिले शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी वेळेत त्यांच्या खात्यामध्ये भरली आहेत. वारंवार याबाबत चौकशी करुनसुद्धा तीन महिन्यांनी त्यांना मीटरचे योग्य रिडिंग घेऊन बिले देण्यात आली नाहीत. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी १७,५६० एवढ्या रकमेचे बिल दिले.
यावेळी मात्र त्यांनी मीटर रिडिंग घेतले. तब्बल दोन वर्षांनी बिल दिले. महावितरणनेच दिलेल्या माहितीनुसार मीटर बिल हे सरासरी तीन महिन्यांचे ११० युनिट आहे. मात्र, सप्टेंबर २०१५मध्ये ६० युनिट दाखवत असताना तेच डिसेंबर २०१५मध्ये २०,०१५ एवढे युनिट दाखवले आणि १७,५६१ रुपये एवढी रक्कम भरण्यास सांगितल्याने शेतकऱ्याला मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत
आहे.
दिलेल्या नोटीसीनुसार चौकशी सुरु असतानाच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज मीटरची जोडणी बंद केल्याने बागायत सुकू लागली आहे. याबाबत महावितरण कंपनी, गुहागरचे अधिकारी जाधव यांच्याकडे चर्चा केली असता याबाबत म्हणावा तसा खुलासा केला नाही. आम्ही नियमानुसार रिडिंग घेऊन बिल दिले आहे.
तुम्हाला मीटर तपासणी करायची असेल तर ५०० रुपये आधी पैसे भरा, मग मीटर कनेक्शन देतो, असा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याच्या विषयाला धुडकावून लावले. याबाबत तहसीलदार, गुहागर यांच्याकडे ही तक्रार केली असता त्यांनी महावितरणचे अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करु शकत नाही. तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्याला दिली आणि विषय थांबवला.
या सर्व प्रकारावरून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे न्याय मिळू न शकल्याने शेतकरी प्रकाश मांडवकर यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आधी पैसे भरा, मगच पुन्हा जोडणी करतो, असे महावितरणने स्पष्ट सांगितल्याने जिवापाड वाढवलेली बागायत पाण्याविना सुकून जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)