साखरपा पॅटर्न कोकणभूमीला जलसमृध्दी देणारा : जलतज्ज्ञ अजित गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:21+5:302021-09-02T05:08:21+5:30
रत्नागिरी : नाम फाऊंडेशन व लोकसहभागातून साखरपा येथे काजळी नदीच्या झालेल्या पुनरुज्जीवनामुळे यावर्षीच्या ढगफुटीसदृश्य पावसातही साखरपा बाजारपेठ पुरापासू्न वाचली ...

साखरपा पॅटर्न कोकणभूमीला जलसमृध्दी देणारा : जलतज्ज्ञ अजित गोखले
रत्नागिरी : नाम फाऊंडेशन व लोकसहभागातून साखरपा येथे काजळी नदीच्या झालेल्या पुनरुज्जीवनामुळे यावर्षीच्या ढगफुटीसदृश्य पावसातही साखरपा बाजारपेठ पुरापासू्न वाचली आहे. नदी संवर्धनाचा हा साखरपा पॅटर्न कोकणभूमीला नवसंजीवनी ठरेल. नदी संवर्धनाची पायवाट सर्वांनी ठळक करण्याची गरज जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी साखरपा येथे जलप्रहारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली.
संगमेश्वर तालुक्यात झालेल्या जल चळवळीचे काम पाहण्यासाठी नाम फाऊंडेशनची अभ्यास समिती नुकतीच या भागात दाखल झाली होती. यात यशदा, पुणेचे कार्यकारी संचालक, जलमित्र सुमंत पांडे, नाम फाऊंडेशनचे समीर जानवलकर, जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले, अविनाश निवाते यांचा समावेश होता. यावेळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विशाळगडच्या पायथ्याशी उगम पावणारी काजळी नदी देवडे ते चांदेराईपर्यंत वाहते. संपूर्ण नदीची मोहीम हाती घेऊन ‘हेड टू टेल’ या स्वरूपात जलस्रोत व नदी जपता येईल, असा विश्वास नाम फाऊंडेशनच्या अभ्यास समितीने या बैठकीत व्यक्त केला.
यावेळी समितीने साखरपा, देवडे व देवळे याठिकाणी काजळी नदीचे झालेले काम तपासले. यावेळी चैतन्य सरदेशपांडे, धनजंय आठल्ये यांनी अनुभव मांडले. यावेळी मानव लोक संस्था, बीडचे लोहिया व त्यांचे कार्यकर्ते तसेच राजेंद्र लाड, ओंकार आठल्ये, समीर नवाथे, बंड्या कुष्ठे, ग्रामपंचायत सदस्य मंदार आठल्ये व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
साखरपा येथे एक किलोमीटरच्या नदीला पुनरुज्जीवन देताना येथील रोजंदार व चहा टपरीवाले यांनी पिग्मी देऊन तसेच परदेशात नोकरीला असलेल्या भूमिपुत्रांनी नदीसाठी सढळहस्ते निधी देऊन नदी संवर्धनाला बळ दिले. सर्वत्र पुराचे चित्र असताना यंदा साखरपा बाजारपेठ मात्र पुरापासून वाचल्याचे गौरवोद्गार जलमित्र सुमंत पांडे यांनी काढले. कोकणातील नदी संवर्धनाला गती देण्यासाठी ‘नदीची शाळा’ हा उपक्रम हाती घेऊन नदी व पर्यावरण जपणारी नवी पिढी उभी करावी लागेल, असे मानव लोक संस्थेचे लोहिया (बीड) यांनी सुचवले.
साखरपा येथील काजळी पॅटर्न समोर ठेवून आंबा ते मलकापूर या दरम्यान वाहणाऱ्या कडवी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम हाती घेतल्याची माहिती प्रकल्प प्रमुख राजेंद्र लाड यांनी दिली.
साखरपा येथील तीन कुंडांची पुनर्उभारणी व जिथे काजळी व मुर्शीतून येणाऱ्या नदीचा संगम होतो, तेथे पात्राच्या खोलीकरणाची आवश्यकता गिरीश सरदेशपांडे यांनी मांडली.
मुर्शी, देवडे, किरबेट, कोंडगाव या संलग्न पात्रांचे काम होईल तेव्हा येथील नदीचे झालेली खोलीकरण टिकून राहील, अशी भूमिका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी मांडली.
...............................
शासकीय स्तरावरील निधीची मागणी
दोन महिन्यात एकतीस लाख रुपयांचा निधी उभा केला. मात्र, यापुढील कामासाठी शासकीय स्तरावरून निधी मिळावा, अशी मागणी काजळी नदी जलसंवर्धन समितीने केली. यावेळी नदी संवर्धन मोहिमेत मार्गदर्शन केलेले ‘नाम’चे समीर जानवलकर व जलतज्ज्ञ समितीचे अविनाश निवाते यांचा गौरव करण्यात आला.
...........................
‘नाम’चा निर्धार..
कोरोना संसर्गामुळे कोलमडून पडलेल्या कोकणाला वादळानंतर अतिवृष्टीचा व भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. बदलत्या हवामानानुसार कोकणी माणसाला शेती व आपली जीवनशैली बदलून निसर्ग बदलाला सामोरे जावे लागेल. निसर्ग जपला पाहिजे, ही खूणगाठ पक्की करून नाम फाऊंडेशन चिपळूणला कवेत घेतलेल्या वाशिष्ठी व जगबुडी नद्यांच्या संवर्धनासाठी पुढे आले आहे. जिल्हा प्रशासन, पर्यावरणप्रेमी संस्था, एन. जी. ओ. संस्था यांच्या सहभागातून कोकणच्या या जीवनवाहिन्यांना नवसंजीवनी देता येईल, अशी भूमिका नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ‘नाम’चे विश्वस्त इंद्रजित देशमुख व संचालक मल्हार पाटेकर यांनी मांडली.
................
फोटो मजकूर
साखरपा येथील काजळी नदीच्या पुनरुज्जीवन कामाची तपासणी यशदा, पुणेचे कार्यकारी संचालक सुमंत पांडे यांनी केली. यावेळी नाम फाऊंडेशनचे समीर जानवलकर, जलतज्ज्ञ समितीमधील डॉ. अजित गोखले, अविनाश निवाते, श्रीधर कबनूरकर, गिरीश सरदेशपांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.