अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST2021-06-04T04:24:13+5:302021-06-04T04:24:13+5:30

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात दि. ३ ते दि. ९ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात ...

ST for essential services. The service will continue | अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार

अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात दि. ३ ते दि. ९ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत मोजक्या फेऱ्या सुरू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.

कोरोनामुळे गतवर्षी मार्चमध्ये सलग दोन ते अडीच महिने एस. टी. सेवा बंद होती. मात्र, शासनाच्या परवानगीनुसार टप्याटप्याने एस.टी. सेवा सुरू करण्यात आली. ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने एस़ टी़ बस धावू लागल्या. त्यानंतर रत्नागिरी विभागातून एकूण ६०० बसद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांमधून दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती़ त्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होते. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने दि. १५ एप्रिलपासून पुन्हा संचारबंदी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला विकेंड लाॅकडाऊन त्यानंतर लाॅकडाऊनच घोषित करण्यात आले. यावर्षी अत्यावश्यक सेवेंतर्गत एस. टी. बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभत नसला तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाहतूक मात्र करण्यात येत आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सध्या १४० गाड्यांद्वारे ५२० फेऱ्या चालविण्यात येत होत्या. त्यामुळे दिवसाला १६ हजार प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याने सहा ते साडेसहा लाखांचे उत्पन्न प्राप्त होत होते. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचे कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. खासगी आस्थापना बंद राहणार आहेत. बँका, पतसंस्था दुपारपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पुन्हा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी. सेवा सुरू राहणार असून, २० ते ३० गाड्यांद्वारे जेमतेम ६० ते ६५ फेऱ्या सुरू राहणार असल्याने रत्नागिरी विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: ST for essential services. The service will continue