शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले
By संदीप बांद्रे | Updated: February 16, 2025 14:47 IST2025-02-16T14:45:48+5:302025-02-16T14:47:18+5:30
मातोश्रीवर बोलविलेल्या बैठकीला भास्कर जाधव गैरहजर राहिले होते. यावरून उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवसेनाप्रमुखांची शिवसेना तोतया वारसदारांच्या हातात; नाराजीच्या वृत्तांनंतर भास्कर जाधव कडाडले
संदीप बांद्रे
चिपळूण : एका रात्रीत तलाठी मूळ वारसदाराला डावलून तोतया वारसदाराचे नाव सातबारावर दाखल करतो. आमच्या शिवसेना पक्षाचा देखील असंच झालं आहे. हिंदुरुदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. परंतु विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी खऱ्या वारसदाराला बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना, निशाणी, झेंडा हा तोतया वारसदारांचा असल्याचं ठरवलं हे दुर्दैवी असल्याचे परखड मत आमदार भास्कर जाधव यांनी येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
याविषयी आमदार जाधव यांनी सांगितले की, गेल्या चार दिवस मी जे वक्तव्य केलं नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही. त्याला प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी देऊन खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया माझेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. मला माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे आणि अशी संधी केवळ मलाच मिळाली नाही असं नाही, तर ती अनेकांना मिळत नसते, असे मी म्हणालो. परंतु मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही असं मी बोलल्याचं सातत्याने हायलाईट केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मुळात माजी आमदार राजन साळवी यांनी इतर पक्षांमध्ये जाऊ नये याकरता मी सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झालेल्या लढाईचा दाखला देऊन आपलं राजकीय मरण तर पक्क आहे, मग परतीचे दोर कापले असे समजून लढू, प्रसंगी मरण पत्करू आणि जिंकू असा आवाहन मी त्यांना केलं. पण ते अन्य पक्षात गेले तेव्हा 'राजन साळवी गेले म्हणून रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण तिकडे गेला असे होत नाही, तेव्हा मी त्यांच्याविषयी काही गोष्टी बोललो. आज कोणीही कुठेही गेला तरी सुद्धा ज्याप्रमाणे विजापूरच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक पाण्याने भरलेला होता किंवा आहे व त्यामध्ये शत्रूचे सैन्य पडून मृत्यू ओढवून घेत होते. मग खंदकात पडून मरण्यापेक्षा आपण सर्वांनी लढू या आणि जिंकूया, असा माझा पक्षातील पदाधिकऱ्यांकडे आग्रह आहे. त्यासाठी वेळ पडल्यास पक्षाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मला विरोधी पक्षनेता पद मिळण्याकरता मी नाराजीचं नाटक करत आहे हे सातत्याने माध्यमांवर दाखवणे हे तर माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय सिद्धांतावर प्रचंड असा अन्याय करणारं आहे, असे जाधव यांनी म्हटले.
मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो. आता माझ्या उत्तरार्धाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी माझ्या तत्त्वांना मूठ माती द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. उलट मूळ शिवसेनेवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागत आहोत. पण तिथेही तारीख पे तारीख आम्हाला मिळत आहे. पण आम्ही हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू.असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.