रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:33 IST2016-06-27T22:57:04+5:302016-06-28T00:33:50+5:30
विविध ठिकाणी पडझड : अडीच लाखांची हानी, रत्नागिरी, लांजात कमी नुकसान

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले...!
रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले असून, जागोजागी पाणी भरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधार पडणाऱ्या पावसमुळे पडझड होऊन जिल्हाभरात सुमारे २ लाख ५२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोेमवारी सांयकाळी पावसाने क्षणभर विश्रांती घेतली.
रविवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी व लांजा तालुका सोडल्यास सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंडणगड येथील तोडली येथे घराचे ६ हजार ८०० रुपयांचे नुकसान, मौजे भिंगळोली येथे घराचे १४ हजार ८५० रुपयांचे नुकसान, मौजे मंडणगड येथे घरांवर बांध कोसळून २१९५ रुपयांचे नुकसान झाले. मौजे पालघर येथे चंद्रकांत तपकिरी यांचे कंपाऊंडचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, मंडणगड तालुक्यात दोन दिवसात सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे २ घरांचे १६ हजार ४०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. हर्णै येथे नथुराम वैद्य यांच्या गडग्याचे ४ हजार ८०० रुपयांचे, तर एका घराचे २१०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. मौजे पाडले येथे घराचे २३ हजार रुपयांचे किरकोळ नुकसान झाले. गव्हे येथे घराचे १००० रुपयांचे किरकोळ, तर मांदिवले येथे एक गोठा पूर्ण कोसळला असून, मालकाचे ७५ हजार रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. दापोली येथे सुमारे १ लाख २३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले.
खेड येथे रस्त्यात दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती. मौजे कसबा नातू येथे बांध कोसळल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात मौजे विल्ये येथे गोठ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात चिखली-कारोळ व पालपेणे साखरी त्रिशुळ येथील मोऱ्या ढासळल्याने नुकसान झाले आहे. मौजे कासुर्ली येथे घरावर झाडाची फांदी पडून ४ हजार ५५० रुपयांचे, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कंपाऊड वॉल कोसळल्याने २९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागरात एकूण ३३ हजार ४५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर येथे ४ घरांचे ३३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले आहे, तर मौजे माखजन येथे घरावर झाड पडल्याने दोन घराचे ३ हजार २१० रुपयांचे नुकसान झाले आहे. राजापूरमध्ये एका घरांची भिंत कोसळून ५ हजार रुपये, तर राजापूर वरचीवाडीमध्ये पडवी कोसळल्याने ५ हजार रुपये नुकसान असे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात २,५२,८०० इतके नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
राजापुरात व्यापाऱ्यांची धावपळ
दापोलीत अंगणवाडी जमीनदोस्त
भोर महाड मार्गावरील वाहतूक बंद; बस अडकली
गावखडीत घर कोसळले, महिला बेघर