प्रथमेश दळवी, गोपीनाथ नाचरे यांची बाजी
By Admin | Updated: December 26, 2015 00:08 IST2015-12-25T22:47:13+5:302015-12-26T00:08:52+5:30
मंडणगड पंचायत समिती : तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग

प्रथमेश दळवी, गोपीनाथ नाचरे यांची बाजी
मंडणगड : लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, रत्नागिरी व पंचायत समिती, मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेतील वरिष्ठ गटात प्रथमेश दळवी आणि कनिष्ठ गटात गोपीनाथ नाचरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर उपस्थित होते. कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांत ‘स्वच्छता व पाणी व्यवस्थापन’ या विषयांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील वरिष्ठ विभागातून प्रथमेश दळवी, आकाश सावरकर (दोघे लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय, मंडणगड), अनिकेत नाचणेकर(व्ही़ बी़ डी़ बी़ ए़ महाविद्यालय, आंबडवे) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ त्याचबरोबर कनिष्ठ विभागातून गोपीनाथ नाचरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड), देवयानी भोईटे (लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय, मंडणगड), उमेश मंद्रे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ स्पर्धेत परीक्षक म्हणून दिलीप मराठे, शांताराम पवार व हनुमंत सुतार यांनी काम पाहिले़ स्पर्धेत वरिष्ठ विभागाचे समन्वयक म्हणून डॉ. अशोक साळुंखे तर कनिष्ठ विभागाचे समन्वयक म्हणून प्रा़ महादेव वाघ यांनी काम पाहिले़ दोन्ही विभागातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले़
प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी सांगितले की, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या संतांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व सांगितले़ पण आज त्यांच्या कार्याचे महत्व पुन्हा एकदा पटवून देण्याची आवश्यकता आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेड्यापाड्यात विशेषत: तरुणांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे़
कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी जयसिंग कांबळे, गट समन्वयक जितेंद्र साळवी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी धोंडीराम बंडे, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता घाडगे यांनी केले तर आभार अशोक साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडणगड महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांसह पंचायत समितीचे जितेंद्र साळवी व धोंडीराम बंडे यांनी मेहनत घेतली.़ (प्रतिनिधी)