विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:53+5:302021-06-02T04:23:53+5:30
मंडणगड : तौक्ते वादळानंतर अद्यापही तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत ...

विजेचा लपंडाव
मंडणगड : तौक्ते वादळानंतर अद्यापही तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. उष्म्यामुळे घामाने नागरिक हैराण होत असून, त्यातच विजेच्या लपंडावामुळे कमालीचा त्रास सोसावा लागत आहे.
कंत्राटी कामगार वंचित
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे गेली दोन वर्षे आरोग्य यंत्रणा तणावाखाली काम करीत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांची नियुक्ती करण्यात आली. सेवामुक्तीनंतर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांना विमा कवचापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
दोन जिल्ह्यांचा आराखडा
रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी व्यापक आराखडा तयार करण्याचे काम भारत संचार निगमचे अधिकारी करीत आहेत. या आराखड्यासह प्रभू स्वत: दूरसंचार मंत्र्यांची बैठक घेणार असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल क्रांती होणार आहे.
खांब बदलण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील कोतापूर घुमेवाडी येथील विजेचे खांब गंजले असून, तळाकडील भाग सडला आहे. हे खांब केव्हाही कोलमडून पडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने खांब बदलण्याची मागणी शिवतेज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
ग्राहकांची गैरसोय
गुहागर : तालुक्यातील कोतळूक बागकर स्टॉप येथील भारत संचार निगमचा टॉवर बंद असून, रेंज नसल्यामुळे परिसरातील ग्राहकांची गैरसोय होत आहे. हा टॉवर तातडीने कार्यान्वित न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मोबाइल टॉवर बंद असल्याने केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे.
शिक्षक नाराज
रत्नागिरी : राज्यातील शिक्षकांना कोरोनासंदर्भात सेवेत मोठ्या प्रमाणावर सामील करून घेतले जात आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकांनाही कोरोनाच्या सेवा बंधनकारक करण्यात आल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ५० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांना ड्यूटी देऊ नये, अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
रत्नागिरी : पोषण ट्रॅकर अॅप उपलब्ध झाले पाहिजे. अन्यथा अंगणवाडी कर्मचारी त्यावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. या मुख्य मागणीसह अनियमित पोषण आहार, विमा व मोबाइल प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांना मदतीचे वाटप
साखरपा : लाॅकडाऊन काळात सर्व व्यवसाय बंद राहिल्याने अनेक कुटुंबांची सध्या उपासमार होत आहे. मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये, यासाठी भडकंबा ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
मच्छिमारी थांबली
दापोली : १ जून ते ३१ जुलै या पावसाळी हंगामात आता मच्छिमारीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व मच्छिमारी नाैका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. तालुक्यातील हर्णे बंदरातही मच्छिमारांच्या बोटी समुद्राबाहेर काढण्यासाठी धावपळ झाली होती.
खरेदीसाठी लगबग
रत्नागिरी : जिल्ह्यात २ जूनपासून कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता आठ दिवस सर्वच बंद राहाणार असल्याने लोकांनी दूध, भाजीपाला आदींच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळी साडेअकरा - बारा वाजेपर्यंतही काही दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.