खेडमध्ये टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:10+5:302021-05-05T04:51:10+5:30

खेड : तालुक्यात दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. कडाक्याच्या उष्म्यामुळे नद्या-नाल्यांसह उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालल्याने, ग्रामस्थांची ...

The number of scarcity-hit villages in Khed increased | खेडमध्ये टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढली

खेडमध्ये टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढली

खेड : तालुक्यात दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढू लागली आहे. कडाक्याच्या उष्म्यामुळे नद्या-नाल्यांसह उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालल्याने, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. सद्यस्थितीत १० गावे १७ वाड्यांमध्ये एका शासकीय व तीन खासगी वाहनांद्वारे टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. या टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना चोरद नदीपात्रातून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रशासनाने तयार केलेल्या टंचाईकृती आराखड्यात ५९ गावे १९८ वाड्यांचा समावेश केला आहे. यातील सद्यस्थितीत १० गावे १७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. खवटी-खालची व वरची धनगरवाडी, आंबवली-भिंगारा, सवणस-मूळगाव, खोपी-रामजीवाडी, तुळशी-कुबजई, कुळवंडी-शिंदेवाडी, कशेडी बंगला, नांदिवली-देऊळवाडी, बौद्धवाडी, घेरारसाळगड-निमणीवाडी, देवसडे-सावंतवाडी, कदमवाडी, मधलीवाडी, जाधववाडी आदी गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भीक्ष निर्माण झाल्याने ग्रामस्थांची सारी मदार टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.

तालुक्यात तहानलेल्या गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही प्रशासनाकडे अवघा एकच शासकीय व तीन खासगी टँकर उपलब्ध आहेत. या टँकरद्वारे तहानलेल्या गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र, तरीही पाण्यावाचून ग्रामस्थांचे

हाल होणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी पंचायत समितीच्या पाणी विभागाकडून घेण्यात येत आहे. टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल होताच तातडीने सर्वेक्षण करून, पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, या तहानलेल्या गाव-वाड्यांना दिलासा मिळत आहे.

Web Title: The number of scarcity-hit villages in Khed increased