चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी लवकरच उपाययोजना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:26+5:302021-08-21T04:36:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ...

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी लवकरच उपाययोजना राबविणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चिपळूण शहराला वारंवार येणाऱ्या पुरापासून वाचविण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.
चिपळुणातील वाशिष्ठी व शिवनदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे तसेच वाशिष्ठी नदीमध्ये बहाद्दूरेशख नाका, फरशी पूल, नाईक कंपनी व पेठमाप पेठमाप पुलानजीक गाळाचे बेट निर्माण झाले आहे. हे बेट हटविणे आवश्यक आहे तसेच पूरसंरक्षक कामांमध्ये नदीच्या बाजूस काठावर भराव करणे, तसेच दगडी अथवा संधानक अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण शहरात काही ठिकाणी नागमोडी वळणाने वाहते. त्यामुळे अशा ठिकाणी नदीच्या प्रवाहाला खोलीकरण व रूंदीकरण करून उचित दिशा देणे आवश्यक आहे.
नदीच्या आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. गोवळकोट खाडी भागातील गाळ काढणे आवश्यक आहे. नदीतील गाळाच्या भरावासाठी वापर करावा, जंगलतोड बंदी करावी, खासगी जमिनी जंगल वाढीसाठी वनविभागाकडे वर्ग करण्याची तरतूद व्हावी. चिपळूण शहरातील नदीकिनारी वृक्ष संवर्धनासाठी ग्रीन बेल्ट असतो तसा संपूर्ण नदीकिनारी भाग आरक्षित करण्यात यावा. संपूर्ण वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करून सीमांकन करणे आवश्यक आहे. डोंगर खोदण्यास व उत्खननास पूर्णपणे बंदी करणे आवश्यक आहे. चिपळूण शहरात स्टील्ट पार्किंग करुन बांधकामे करावीत. अशा विविध उपाययोजना होणेबाबत आमदार शेखर निकम यांनी चर्चा केली. या सर्व मुद्द्यांवर लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.