कोरोनाच्या परिस्थितीत सावकारीचा जाच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:38+5:302021-07-02T04:21:38+5:30
चिपळूण शहरातील रिक्षा व्यावसायिक अभिजित गुरव या तरुणाने सावकारीला कंटाळूनच आत्महत्या केली. वेळप्रसंगी धमक्या देणे, कर्जदारांच्या घरातील वस्तू उचलून ...

कोरोनाच्या परिस्थितीत सावकारीचा जाच...!
चिपळूण शहरातील रिक्षा व्यावसायिक अभिजित गुरव या तरुणाने सावकारीला कंटाळूनच आत्महत्या केली. वेळप्रसंगी धमक्या देणे, कर्जदारांच्या घरातील वस्तू उचलून आणणे, वाहने जप्त करणे, कर्जदार महिलेला वसुलीच्या वेळी असभ्य भाषा वापरणे असे प्रकार सावकारांकडून नेहमीच घडत असतात. सावकाराकडून कर्ज घेणाऱ्या प्रत्येकालाच हा अनुभव येत असतो. मग तो सावकारी करणारा परवानाधारक असो अथवा विनापरवानाधारक. कर्ज वसुलीची पद्धत दोन्हीकडे सारखीच आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सावकारीच्या या जाचात अनेकजण अडकले आहेत. अनेकांनी स्वाक्षरी केलेला धनादेश देऊन, तर काहींनी कोऱ्या बॉण्डवर सही करून आपली प्रॉपर्टी डावाला लावली आहे. त्यामुळे कर्जदार कितीही प्रामाणिक असला, तरी २० हजारांसाठी दररोज २५० रुपये व्याज आणि हप्ता चुकला तर ५०० रुपये दंड भरावाच लागतो आहे. अशाच एका कर्जातून २० हजारांसाठी एका महिलेला तब्बल एक लाख रुपये मोजावे लागले. चिपळुणातील या प्रकाराविषयी तक्रार झाल्याने तिघांवर गुन्हा दाखल झाला आणि खऱ्याअर्थाने यातील गंभीरता पुढे आली. खरेतर सावकारी करणाऱ्यांना प्रॉपर्टी, वाहने जप्त करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. अगदी तारण कर्ज असले, तरीदेखील प्रॉपर्टी जप्त करता येत नाही. कायद्यालादेखील हे अपेक्षित नाही. शिवाय सावकारी कर्ज देणाऱ्या परवानाधारकांनी रोजच्या रोज रजिस्टर नोंद करावयाची आहे. त्यावर सहाय्यक निबंधकांचे नियंत्रण असायला हवे. परंतु, या बाबींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ही सावकारी आता अनेकांच्या जीवावर बेतू लागली आहे. मुळात प्रत्येकाने आपली कुवत आणि परिस्थिती ओळखून खर्च करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी वायफळ खर्च व शौक करणे टाळायला हवे. अगदी तातडीची गरज असतानाही आपण कर्जबाजारी होत नाही ना, आपला खर्च वाढत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. सावकारी व्याजाच्या कर्जामुळे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सावकारी पद्धत खूप जुनी आहे. परंतु, बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूपही बदलले आहे. तेव्हा अशा कर्जाविषयी प्रत्येकानेच सावधानता बाळगायला हवी.