घरकाम करणाऱ्या हातांनी चमकवले मुलींचे आयुष्य
By Admin | Updated: October 19, 2015 23:47 IST2015-10-19T21:44:49+5:302015-10-19T23:47:04+5:30
दीपा गीते : बालपणापासून संघर्षाचा सामना करण्याची अचाट शक्ती लाभलेली स्त्री--नारीशक्तीला सलाम

घरकाम करणाऱ्या हातांनी चमकवले मुलींचे आयुष्य
शोभना कांबळे -- रत्नागिरी साठा उत्तराची कहाणी पाचाउत्तरी सफळ संपूर्ण होते... पण वास्तव जीवनात काही कहाण्यांना सफळ संपूर्णत्त्व मिळत नाही. रत्नागिरीतील दीपा गीते यांची कहाणी काहीशी अशीच. दु:खांची मालिका न संपवणारी. मात्र, तरीही दु:खाला, संकटांना जिद्दीने हसत सामोरे जाण्याचे अचाट बळ त्यांच्याकडे आहे. म्हणूनच त्यांची कहाणी सफळ संपूर्ण झाली नसली तरी आदराने सलाम करावा अशीच आहे.
खरंतर, दीपामावशीची कहाणी एखाद्या सिनेमात शोभावी अशीच. रत्नागिरीतील प्रसिद्ध पतितपावन मंदिर, वरची आळी येथे दीपा तांबे यांचे बालपण गेले. तीन वर्षांच्या होत्या, त्यावेळी आई गेली. लहान भाऊ त्यावेळी होता अवघा दीड वर्षाचा. याने नियतीचे समाधान झाले नाही म्हणून की काय, त्या चार वर्षांच्या असतानाच पितृछत्रही हरपले आणि ही दोन्ही भावंडे अनाथ झाली. मात्र, काकी सांभाळ करायला पुढे आली. आपल्या तीन मुलांसह तिने या दोघांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेतले. थोड्या दिवसांनी काकांचेही निधन झाल्याने या घरावर दु:खाचा डोंगरच कोसळला. तरीही काकीने स्वत:ला सावरले आणि या पाच मुलांचा आधार बनली. तिने घरकाम करायला सुरुवात केली. छोट्या दीपाला शिक्षणाची, खेळाची आवड होती. तिला रत्नागिरी नगरपरिषदेच्या शाळा क्र. २मध्ये प्रवेशही मिळाला. पण जेमतेम १५ दिवसांची शाळा करून तिने शिक्षणाला कायमचेच राम राम केले आणि मग बालपणीच्या रम्य जीवनात रमण्याऐवजी पाचव्या वर्षीच काकीसोबत कामाला जायला सुरुवात केली ती अगदी आजमितीस. दीपामावशी १४-१५ वर्षांची असताना त्यांच्या वाडीत तेव्हाचे रंगकर्मी प्रकाश घाणेकर आणि दिग्दर्शक प्रकाश गुरव यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक एकांकिका होत. त्यांच्या तालमीला दीपामावशी हटकून हजर असायची. न शिकलेल्या पण तल्लख बुद्धीच्या दीपामावशीचे पाठांतर आपोआप व्हायचे आणि अभिनय चेहऱ्यावर उमटायचा. हे सारं ही नाटकवेडी माणसं पाहात असायची आणि एके दिवशी अचानक लाल गणपतीच्या इथे होणाऱ्या एकांकिका ‘देवमाणूस’साठी दीपामावशीला विचारणा करण्यात आली. यानंतर कष्टप्रद आयुष्यातही तिला नाटकरूपाने आनंद मिळाला. मात्र, हा आनंदही काही काळच टिकला. १८ वर्षे झाल्याने त्यांचे लग्न रत्नागिरीतील दत्ताराम गीते यांच्याशी झाले. पण, हाल काही थांबेतनाच. त्यांना धड नोकरीही नव्हती. पुन्हा घरकामावर संसाराचा गाडा ओढावा लागला. दैव इथेही हात धुवून मागे लागलेले. दहा वर्षातच संसारपट सोडून पती गेले. त्या अवघ्या २९ वर्षांच्या होत्या. पदरात तीन लहान मुली. पण, जगण्याची जिद्द इथंही कामी आली. एक नव्हे; तर सहा - सात ठिकाणी घरकाम करून मुलींना इयत्ता दहावीपर्यंत शिकविले आणि योग्य वेळी त्यांचे लग्न सुस्थळी करून दिले. विशेष म्हणजे कोणाचीही आर्थिक मदत न घेता. आज वयाच्या साठव्या वर्षी त्याचे कष्ट सुरूच आहेत, तरीही त्यात दिलासा आहे तो मुलींचे आयुष्य मार्गी लागल्याचा...!
1काम करत असताना तिने आपले बालपण मात्र कोमजू दिले नाही. ती आजुबाजूच्या इतर मुलांसोबत मनसोक्त खेळायची. तेही क्रिकेट, बेलबॉल, लगोरी, आट्यापाट्या यांसारखे खेळ. सिनेमा, नाटकं, कीर्तन, भजन यांचीही तितकीच आवड. मात्र, या दोन्ही आवडी दीपामावशींनी शेवटपर्यंत जपल्या आहेत. म्हणूनच अशिक्षित असूनही वयाच्या १५व्या वर्षापासून रत्नागिरीचे प्रसिद्ध रंगकर्मी शंकर घाणेकर आणि इतर कलाकारांसोबत तीन अंकी नाटकात काम करून प्रथम क्रमांक पटकावून दिला. त्यांनी अनेक नाटकांतून सहजसुंदर अभिनय करून आपल्यातील अभिनेत्री जागृत ठेवली.
2दीपा मावशींनी घरकाम करताना मायेने जोडलेली माणसे ही त्यांची दौलत असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी धावून येणारे नातेवाईक कुणीच नाहीत, पण त्यांनी ही जोडलेली माणसे मदतीला येतात.
3दीपामावशींना बालपणी क्रिकेटचे वेड होते, अजूनही आहे. विशेष म्हणजे महिलावर्ग क्रिकेटपासून लांब असतो म्हणतात. पण शिक्षणाशी फारकत घेतलेल्या मावशींना या खेळातील सर्व बारकावे कळतात. त्यांना भारतीय सर्व क्रिकेटपटू चांगलेच माहीत आहेत. क्रिकेट मॅच त्या न चुकता बघतात.
4देवघर या एकांकिकेनंतर तर चक्क जीवनसंग्राम या तीन अंकी नाटकात दीपा मावशी यांना मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली. त्यांनी संधीचे सोने केले. रत्नागिरीत विविध ठिकाणी झालेल्या या सर्व नाटकांनी प्रथम क्रमांक मिळविला आणि औरंगाबादच्या रंगभूमीवर हे नाटक सादर करण्याची संधी मिळाली. मात्र, १८व्या वर्षी लग्न ठरल्याने त्यांना या संधीला मुकावे लागले. अन्यथा घरकाम करणाऐवजी त्या आपल्या सौंदर्य आणि तल्लख बुद्धीमत्तेने गुणी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या असत्या. त्यांना अजूनही या सर्व एकांकिका, नाटकांची कथा आणि त्यातील पात्रांची नावे अचूक आठवतात.
5दीपा गीते म्हणजे पूर्वाश्रमीच्या गीता तांबे! यांचे आयुष्य म्हणजे दु:खाचाच सागर. या सागरातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला नाही. पाचव्या वर्षापासून काकीसोबत घरकामासाठी बाहेर पडलेल्या दीपा गीते म्हणजेच सर्वांच्या दीपामावशी यांचे घरकाम आज वयाच्या ६०व्या वर्षीही सुटलेले नाही.
6नाटकात काम करत असताना त्यांना कै. शंकर घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभलेच. पण ज्योती चांदोरकर, निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकारांनाही त्यांनी जवळून पाहिलय. त्यांच्यासोबत त्यांचे फोटोही आहेत.