धान्य दुकानदारांचा प्रश्न गंभीरच
By Admin | Updated: March 25, 2015 00:45 IST2015-03-24T21:13:52+5:302015-03-25T00:45:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार : प्रणाली कोलमडण्याची भीती

धान्य दुकानदारांचा प्रश्न गंभीरच
खेड : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील धान्य दुकानदार पार मेटाकुटीस आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात कृतीत येत नसल्याने त्याचा फटका धान्य दुकानदारांना बसत आहे. आपल्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ दि. १ एप्रिलपासून दुकानदारांनी बंद पुकारला आहे.केंद्र व राज्याच्या धोरणामुळे धान्याचा खडखडाट असून, सामान्यांना धान्य मिळणेही कठीण होऊन बसले आहे. रेशन दुकानात खडखडाट होत आहे. सरकारने दुकानदारांना देऊ केलेल्या सवलती मोडीत काढल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात हा बंद पुकारण्यात येत आहे.
रेशनवर मिळणारे धान्य, धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या सवलती, पूर्वी घोषित झालेल्या सवलती, रसकारचा नाकर्तेपणा याबाबत तालुकास्तरावर अशी निवेदने देण्यात आली होती. शासन व धान्य दुकानदार यांच्यातील संघर्षात शिधापत्रिकाधारकांचे मात्र हाल होत आहेत.
राज्य सरकारने याकामी ठोस पावले उचलावी, अशी मागणी या निवेदनांद्वारे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने सरकारने मार्च २०१४ रोजी अन्न सुरक्षा योजना सुरू केली़ या योजनेद्वारे गरीबांना आणि केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवण्यात येत आहे. या योजनेमध्ये रेशन दुकानदारांना मात्र अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
गेली पंधरा वर्षे रेशन दुकानदार संघटनेने याबाबतचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडली होती़ मात्र, काहीही निर्णय होऊ शकला नाही़ आता वर्र्षभरापुर्वी याबाबत राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या़ यामध्ये रेशन दुकानदार धान्य आणताना गोडाऊन ते अगदी दुकानापर्यंत आकारायचे भाडे हे सरकारने द्यायचे, असे ठरवण्यात आले होते़ याशिवाय अनेक प्रश्न सरकार दरबारी बैठकीत मान्य करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही यातील एकही मागणी या सरकारने पूर्ण केली नाही. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे.
दि. २५ रोजी रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दुकानदार शिष्टमंडळ भेटणार आहे. यावेळी ठोस निर्णय न झाल्यास १ एप्रिलपासून रेशन दुकान बंद आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हापातळीवरील अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली आहे. ़(प्रतिनिधी)