रत्नागिरी : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असते, त्या बाप्पांचे आगमन ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवाला अजून दोन महिने शिल्लक असले तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वत्र महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, परिणामी मजुरी, रंग, मातीचे दर वधारल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गतवर्षी अधिक आषाढ महिन्यामुळे १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता. मात्र, यावर्षी १३ दिवस आधी गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकारांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ केला आहे. प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरातमधून भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे अधिकतम माती आयात केली जाते. तेथून महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येणारे मातीचे पोते ३०० ते ३२५ रुपये दराने विकण्यात येत आहे. भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. तसेच रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.गणपती बाप्पा सर्वांचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपामध्ये पाहणे पसंत करतो. मुंबईतला गणेशोत्सव कोकणवासीयांना भुरळ घालतो. मुंबईमध्ये विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतात. त्यामुळे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाट्सअॅप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. इंटरनेटवरील सोशल साईट्सव्दारे कार्टून्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याची गळ मूर्तिकारास घातली जात आहे.सव्वा इंचापासून साडेतीन ते चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटांपासून दहा बारा फुटी असते. मुंबई, पुणेसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळामध्ये चुरस लागते. बहुधा मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलवताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिस वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकणमातीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तिकार सध्या कामात व्यस्त झाले आहेत.लाल मातीपेक्षा शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. मात्र, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्यामुळे लाल मातीपासूनही गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनते. बहुतांश कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत. (प्रतिनिधी)
दोन महिने अगोदरच गणेश आले आकाराला!
By admin | Updated: July 6, 2016 00:37 IST