सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्याकडूनच शेतकऱ्याला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:54+5:302021-07-20T04:21:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील रोपवाटिका मालक शेतकरी सुभाष धोंडू कदम यांच्याकडून सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ...

सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्याकडूनच शेतकऱ्याला गंडा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील रोपवाटिका मालक शेतकरी सुभाष धोंडू कदम यांच्याकडून सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी २,२०० रोपे विकत घेतली. परंतु, अद्याप त्याचे पैसे अदा केलेले नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सामाजिक वनीकरण विभाग, चिपळूण कार्यालयातील लागवड अधिकारी बनसोडे व वनपाल पवार यांनी ५ मार्च २०२१ रोजी कदम यांच्या खासगी रोपवाटिकेतून साग १,२००, बांबू २३०, जांभूळ, काशिद, चिंच, खैर, काजू व अन्य मिश्र रोपे मिळून ७७० अशी एकूण २,२०० रोपे पिंपळी येथील शासकीय नर्सरीत नेली. पिंपळी येथे नर्सरीत ही रोपे उतरविण्यात आली. या रोपांची २५ हजार रुपये किंमत आहे. मात्र, रोपे नेवून पाच महिने झाले तरी ही रक्कम कदम यांना मिळालेली नाही. आपल्याला रोपांचे बिल मिळावे, यासाठी कदम सातत्याने बनसोडे व पवार यांच्या संपर्कात राहिले व वारंवार बिलाबाबत मागणी केली. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता तर कदम यांचा भ्रमणध्वनी उचलणेही बंद केले असल्याने आपले पैसे देण्याची या अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्याने कदम हतबल झाले आहेत.
कोरोनामुळे गेली दीड वर्ष अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. अशातच काहीतरी उद्योग करणाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिशय कष्टाने कदम यांनी उन्हाळ्यात मुलाप्रमाणे संगोपन करून रोपवाटिका तयार केली. कष्ट केले पण तयार केलेली रोपे सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्यांनी विकत घेऊनही त्याचे अद्याप पैसे न दिल्याने व संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व आपली रक्कम आपल्याला मिळावी, अशी मागणी कदम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.