पटसंख्येअभावी भवितव्य अधांतरी
By Admin | Updated: May 11, 2015 23:28 IST2015-05-11T20:55:02+5:302015-05-11T23:28:24+5:30
राजापूर तालुका : ६८ शाळांना बसणार शासन निर्णयाचा फटका

पटसंख्येअभावी भवितव्य अधांतरी
राजापूर : केंद्र शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पटसंख्येमुळे अबोल होण्याच्या मार्गावर आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाला केलेल्या शिफारशींमध्ये दहा किंंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याबाबत सुचवल्याने राजापूर तालुक्यातील सुमारे ६८ शाळांचे व त्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या दिवसागणिक घटत असून, दुसरीकडे नवीन शाळा व तुकड्यांना मंजुरी मिळावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने याबाबत पूर्ण अभ्यास करुन आपला अहवाल राज्य शासनाला नुकताच सादर केला आहे. त्या अहवालामध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. भविष्यात त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळांना कायमचे टाळे लागणार असून, राजापूर तालुक्यातील ६८ शाळांचा त्यामध्ये समावेश आहे.
केंद्र शासनाने देशभर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षणासाठी करोडो रुपयांचे अनुदान खर्च केले असून, त्या माध्यमातून शाळांच्या वर्गखोल्या सुसज्ज बांधण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत दिवसेंदिवस प्राथमिक शाळांची पटसंख्या घसरत असून, आता भौतिक सुविधांसह सुसज्ज इमारती आहेत , शिकवणारे शिक्षकही आहेत पण त्या इमारतीमध्ये शिकणारे विद्यार्थीच नाहीत, अशी प्राथमिक शिक्षणाची अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रुसव्याने शाळाच अबोल होण्याच्या मार्गावर आहेत.
घसरत्या पटसंख्येमुळे १०पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची शिफारस शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना करावी लागली. राजापूर तालुक्यातील मराठी ६० व उर्दु माध्यमाच्या ८ अशा ६८ शाळांमध्ये कमी पट आहे. त्यामध्ये अणसुरे नं. १, हुर्से, निवेली, साखरकोंबे, साखर मिरगुले पाखाडी, साखर आंबेरकोणी, भालावली नं. ६, देवीहसोळ नं. ३, कोतापूर नं. ४, देवाचेगोठणे अंबरवाडी, केळंबेकरवाडी, विखारेगोठणे नं. २ गोठणे दोनिवडे नं. ४, ५, ६, हातदे नं. २, मूर नं. ४, दोनिवडे गवळवाडी नं. २, हातिवले २, कोंड्ये ४ तांबळवाडी, पांगरीखुर्द २, येरडव २, झर्ये २, केळवली नं. ५, ६, ७, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, जैतापूर आगर, होळी, जुवे जैतापूर, भंडारसाखरी, मिठगवाणे २, ३, धाऊलवल्ली ४, ६, नाटे पडवणे, कोळवणखडी २, ओझर धनगरवाडी, पाचल नं. ४, विल्ये ३, ४, शीळ ३, फुफेरे लिगमवाडी ३, २, शेंबवणे २ वरचीवाडी, आडवली २, सौंदळ ठिकाणकोंड, बांधिवडे, मोसम ३, बारसू २, गोवळ १, ससाळे २ जोगलेवाडी, तळगाव ३, ताम्हाणे धनगरवाडी ६, तारळ लागवणवाडी ४, वडदहसोळ ५, ६, पानेरे, रुंढेतळी, तिवरे आडिवरे अशा साठ मराठी शाळा, तर उर्दु माध्यमाच्या कोंढेतड, रानतळे, बागकाझी मोहल्ला, ओझर, पन्हळे, गोठणे सोगमवाडी, तळगाव व दसूर या शाळांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी मराठी माध्यमाच्या ६८ शाळांमध्ये ३९०, तर उर्दु माध्यमाच्या ८ शाळांमध्ये ४४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. या ६८ शाळा बंद झाल्यास त्यातील एकूण ११५ वर्गखोल्या विद्यार्थ्यांअभावी ओस पडणार आहेत. यापूर्वी या शाळांवर शासनाने करोडो रुपये खर्च केले असून, या बंद वर्गखोल्यांचे भविष्यात शासन काय करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)