आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

By Admin | Updated: October 23, 2016 00:28 IST2016-10-23T00:25:03+5:302016-10-23T00:28:31+5:30

गुहागर तालुका : आधुनिक युगातही काजुर्ली - खडपेवासियांच्या पदरी निराशा

Even today, villagers have the base of the dolly! | आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

अमोल पवार -- आबलोली --देशात ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जात आहे. ‘डिजिटल इंडिया’ घडविण्याचे स्वप्न राज्यक
र्ते पाहात आहेत. मात्र, याचवेळी ग्रामीण भागातील स्थिती अनेक ठिकाणी विदारक असल्याचे दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील काजुर्ली (खडपेवाडी) येथील ग्रामस्थ आजही रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी ‘डोली’ उचलावी लागत आहे.
गुहागर तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकाकडचे दुर्गम गाव म्हणून काजुर्लीची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याचे ठिकाण व गुहागर तालुका यांना जोडणारा भातगाव - राई हा पूल झाल्यानंतर काजुर्ली हे गाव रत्नागिरी ते गुहागर या प्रमुख मार्गावरील महत्त्वपूर्ण गाव बनले आहे.
या गावातील अनेक वाड्या या दुर्गम भागात वसलेल्या असून, येथे लोकसंख्याही विरळ आहे. यातील खडपेवाडीमध्ये सुमारे १५ घरे असून, येथे कायम वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची संख्या अंदाजे ३० एवढी आहे. सण - उत्सवानिमित्तच गावाबाहेर असलेली मंडळी वाडीत येतात. मात्र, सण संपताच पुन्हा नेमकीच माणसे वाडीत शिल्लक राहतात.
आज शासन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत असताना या वाडीत अजूनही रस्त्याचा पत्ता नसल्याने जर कुणी आजारी पडले, तर त्याला डोलीतून उचलून दोन किलोमीटर चालत गुहागर - काजुर्ली - रत्नागिरी या मुख्य रस्त्यावर आणावे लागते आणि तेथून पुढील उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यातच प्रमुख रस्त्याकडे जाणारी पाऊलवाटही निमुळतीच आहे.
लहान मुलांचा पाळणा या डोलीसाठी वापरला जातो. यामध्ये पाळण्याच्या दोन्ही बाजूला घट्ट असे बांबू बांधले जातात व त्या पाळण्यात रुग्णाला बसविले जाते आणि मग ही डोली उचलून खांद्यावरुन वाहून नेली जाते. ही डोली उचलणारी माणसेसुद्धा बहुतेकवेळा वयस्करच असतात. कारण वाडीतील बहुतांशी तरुण हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय वर्चस्वासाठी येथील ग्रामस्थांचा केवळ वापर करण्यात आल्याचेच आजपर्यंत दिसून आले आहे.


निवडणुकीत केवळ आश्वासनांचा महापूर
विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या वाडीसाठी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या सर्व वल्गनाच ठरल्या. ग्रामपंचायतीने काही निधी खर्च टाकून रस्त्याचे कच्चे प्रारुप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशा निधीअभावी हा रस्ता अपूर्णच राहीला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कुणीतरी येऊन आश्वासने देतील व वाडीतील सुमारे ३० मते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर पुन्हा विसरतील. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या खांद्यावरील डोलीचे ओझे उतरेल की नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Web Title: Even today, villagers have the base of the dolly!