पावसाचा जाेर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:42+5:302021-06-16T04:41:42+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती ...

पावसाचा जाेर कमी
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती होती. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर पाहता संततधार सुरूच राहणार असे वाटत होते. मात्र, अधूनमधून सूर्यदर्शन घडवीत मधूनच सर कोसळत होती. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३०६.८० मिलीमीटर (३४.०९ मिलीमीटर) पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यात खोपी येथे महेश वसंत निकम हे १० जून रोजी घरातून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह १३ जून रोजी चक्रवती नदीजवळ सापडला.
रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर ४ जणांच्या शेतात पावसाचे पाणी शिरून शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) बांध फुटून अंशत: नुकसान झाले. हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कुरतडे येथील चंद्रकांत लिंगायत यांच्या ताब्यातील गाडी (क्र. एमएच ०३ बीएच ३३४०) ही टेंभ्ये पूल येथे चालवित आले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. त्यांनी गाडीतून उडी घेऊन बाहेर पडल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. उक्षी येथे दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील गणपती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. गोविळ-बुरंबेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पावसामुळे खचली.
मंगळवारी सकाळी पावसाचा जोर वाढेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कमी झालेला दिसत होता.