दापोली---कमी मतदानाची उत्साही चर्चा
By Admin | Updated: October 17, 2014 22:13 IST2014-10-17T21:57:16+5:302014-10-17T22:13:20+5:30
कमी झालेले मतदान निरुत्साहामुळे झाले की

दापोली---कमी मतदानाची उत्साही चर्चा
शिवाजी गोरे - दापोली -दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार एवढी मतदारसंख्या आहे. त्यापैकी १ लाख ६१ हजार ६५० एवढे मतदान झाल्याने या मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. २००९च्या तुलनेत यावर्षी मतदानात मोठी वाढ झाली नाही. मतदारांना परिवर्तन हवे होते म्हणून लोकसभेला ७० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. परंतु यावेळी मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह आढळून आला नाही. कमी झालेले मतदान निरुत्साहामुळे झाले की, मतदारांना बदल नको होता, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.दापोली विधानसभा मतदारसंघात यावेळी फारच चुरशीची लढाई पाहायला मिळाली. निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार असल्याने मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हा मुद्दा विजय सोपा करणारा असल्याने राजकीय पक्षांचे डावपेच अपक्षांभोवती फेकले गेले होते. या निवडणुकीत शिवसेनेकडून सूर्यकांत दळवी हे एकमेव अनुभवी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पाच वेळा निवडून जाणारे दळवी यावेळी षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते यावेळी षटकार मारतात की, षटकार मारताना ‘कॅचआऊट’ होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. दापोली विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच भाजपा, राष्ट्रवादी या पक्षाने तगडे आव्हान दिल्यामुळे या वेळी विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सेनेला झगडावे लागले. दापोली शिवसेनेचा बालेकिल्ला असूनसुद्धा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा घेण्याची वेळ पहिल्यांदाच आली. सत्ता आल्यास दापोलीला लाल दिवा देण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हे स्वप्न पूर्ण होते की स्वप्नच राहाते, हे येत्या १९ तारखेलाच कळेल.
दापोली विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपातर्फे केदार साठे तरुण नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांना विकासाच्या मुद्द्यावर उघडपणे चॅलेंज देणारे केदार साठे एकमेव होते. मात्र, त्यांनी केलेल्या प्रचाराचा किती फायदा झाला. मतदारांना काय अपेक्षित आहे. मतदार तरुण नेतृत्व मान्य करतात की जुनं तेच सोने म्हणतात. हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. भाजपा यावेळी स्वतंत्र लढल्यामुळे सेनेमुळे झाकोळलेल्या भाजपाची ताकद किती हेसुद्धा या निकालावरुन सिद्ध होणार आहे. दापोली मतदारसंघात २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्याची संधी मिळाली. आघाडीतही जागा काँग्रेस पक्षाकडे होती. मात्र, काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटातटामुळे ही जागा १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसला गमवावी लागली. राष्ट्रवादीच्या उदयानंतर राष्ट्रवादीने या जागेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला होता. राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली.
राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. परंतु एकेकाळचे सहकारी राष्ट्रवादीचे खेड माजी तालुकाध्यक्ष विजय कदम यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कदम समर्थक आपल्याला साथ देतील, असे वाटत असताना रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांनी खेड तालुका शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहील, असा रामदास कदम यांचा आदेश असल्याचे सांगून खेड शिवसेनेला कानमंत्र देण्याचा उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने प्रयत्न केला. मात्र, विजय कदम फॅक्टर, रामदास कदम फॅक्टर किती प्रभावी ठरतो. मतदार कोणाला झुकते माप देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.