अर्जुना परिसराला भरतीचा तडाखा
By Admin | Updated: January 25, 2015 00:53 IST2015-01-25T00:53:30+5:302015-01-25T00:53:30+5:30
शेतकरी भयग्रस्त : शेतात पाणी घुसल्याने नुकसान

अर्जुना परिसराला भरतीचा तडाखा
राजापूर : मागील ६० ते ७० वर्षांत कधी आली नाही, एवढी भरती दोन दिवसांपूर्वी आल्याने खाडीकाठावरील अनेक लगतच्या गावातील शेतजमिनीत खारे पाणी घुसून, मोठ्या प्रमाणात तयार पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर जमीन पुढील काही वर्षांसाठी नापीक बनण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील अर्जुना नदीकाठानजीक तसेच खाडी किनाऱ्यालगत असणारे विल्ये, गोवळ, शिवणे पडवे, अणसुरे पाखाडी या गावातील शेतकऱ्यांना या मोठ्या भरतीचा फटका बसला आहे. दरवर्षी या गावातील अनेक शेतकरी वरणा, उडीद, कुळीथ, मिरची, वांगी, वाल यासहित विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊन त्यावर आपली उपजीविका करीत असतात. स्थानिक बाजारपेठेत या मालाची विक्री होत असते. मात्र या समस्त शेतकऱ्यांना गत मंगळवारी आलेल्या भरतीने दणका दिला आहे.
या गावातील बुजुर्ग मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार मागील ६० ते ७० वर्षात एवढी मोठी भरती कधीच आली नव्हती. या भरतीचे पाणी आजूबाजूच्या भातशेतीच्या जमिनीत घुसले असून, त्यामुळे अनेक ठिकाणची तयार पीकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहेच. शिवाय परिसरातील मोठ्या प्रमाणातील भातजमिनी नापीक बनण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे, स्थानिक शेतकऱ्यांपुढील प्रश्न अधिक जटील बनला आहे. येऊन गेलेल्या भरतीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी सागवे जिल्हापरिषद सदस्य अजित नारकर, अणसुरे पंचायत समिती सदस्या रेखा कोंडकर, कृषी अधिकारी भाऊसाहेब मराठे, आपटे गावचे पोलीस पाटील आदींनी केली आहे.
अचानक आलेल्या मोठ्या भरतीने स्थानिक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण कायम आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीकाठी असलेल्या शेतजमिनीचे नुकसान दोन दिवसांपूर्वी आलेल्या प्रचंड भरतीमुळे झाले आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासकीय यंत्रणेने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी त्या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सत्तर वर्षांत प्रथमच भरतीचे पाणी गावात घुसले.
विल्ये, अणसुरे, पडवे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
भातशेतीबरोबरच हिवाळी भाजीपालाही वाया.
संभाव्य धोका टाळण्यासाठी महसूलकडे धाव.
पंचनामे कधी करणार.
महसूल पथक गावात येणार.